- “ज्ञानोबा – माऊली – तुकाराम” नाद निनादला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२१) :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या १९० व्या आषाढी वारी प्रस्थान सोहळ्यास पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. शासनाच्या नियमांचे पालन करत अगदी साध्या पद्धतीने निमंत्रित वारकऱ्यांच्या समवेत सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास माउलींच्या चांदीच्या चलपादुकांनी मुख्य मंदिरातून प्रस्थान ठेवले.
प्रस्थान सोहळ्यास शुक्रवारी (दि.०२) पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाल्यानंतर माउलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती व महापूजा संपन्न करण्यात आली. विणामंडपात सकाळी दहानंतर ह.भ.प. भगवान महाराज कबीर यांचे काल्याचे कीर्तन झाले. बाराच्या दुपारी बारा ते साडेबारा दरम्यान माऊलींना नैवद्य दाखविण्यात आला. त्यानंतर चारला प्रस्थानच्या मुख्य कार्यक्रमास सुरूवात झाली.
माउलींची व गुरू हैबतबाबांची आरती घेऊन देवस्थानच्या विश्वस्तांकडून माउलींच्या चांदीच्या चलपादुका परंपरेनुसार पालखी सोहळा मालक राजेंद्र पवार – आरफळकर यांच्या हातात सुपूर्द करून चलपादुकांचे मंदिरातून प्रस्थान ठेवण्यात आले.
वीणा मंडपातून चलपादूका बाहेर आणल्यानंतर मंदिर आवारात उपस्थित वारकऱ्यांच्या “ज्ञानोबा – माऊली – तुकारामांच्या” जयघोषात मंदिर प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर देऊळवाड्याच्या दरवाजाने परंपरेप्रमाणे पादुका लगतच्याच आजोळघरात (दर्शनमंडप) विराजमान करण्यात आल्या. त्याठिकाणी समाजआरती घेऊन पहिल्या दिवसाचा जागर करण्यात आला.