- ७५ व्या स्वातंत्र्यदिनी शहरातील वृक्षप्रेमींचा पोलीस मुख्यालयात विशेष सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ ऑगस्ट २०२१) :- सन २०१८ ते २०१९ मध्ये देहू ते निगडी दरम्यान प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती व पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय – देहूरोड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हरित वारी व प्लास्टिक मुक्त वारी’ हे सामाजिक उपक्रम राबविण्यात आले होते. या हरित वारीमध्ये सहभागी स्वयंसेवकांचा सन्मान पिंपरी चिंचवड शहर आयुक्त कृष्णप्रकाश यांच्या हस्ते, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात करण्यात आला.
या प्रसंगी मुख्यालय वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर, आयुक्तालय जनसंपर्क अधिकारी डोंगरे, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती अध्यक्ष विजय पाटील, महिला अध्यक्षा अर्चना घाळी – दाभोळकर, संपर्क प्रमुख विजय मुनोत उपस्थित होते. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले,” आपल्या शहरातील हरित पट्टा वाढल्यास प्रदूषणाची पातळी नक्किच कमी होण्यास मदत मिळेल.संपूर्ण राज्यात संतांच्या पालखीसोबत परंपरेने साजरा होणारा वारीचा सोहळा अद्वितीय आहे. अशी ही “हरितवारी” वृक्षलागवडीमुळे पर्यावरण पूरक बनली आहे, स्वयंसेवकांचा वृक्षलागवाडील उस्फुर्त सहभाग नक्कीच कौतुकास्पद आहे.”
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर म्हणाले,” जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या पोलीस मित्र, एस पी ओ, स्वयंसेवकांची मदत पोलीस प्रशासनाला गेल्या अनेक वर्षांपासून मिळत आहे, बंदोबस्त, गस्त, हरित वारी करिता समितीचे योगदान बहुमूल्य आहे. आज त्यांचा सन्मान करताना आनंद होत आहे.”
समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” गेल्या १६ वर्षांपासून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये देहूरोड पोलीस ठाण्यास समितीच्या सदस्यांचे बंदोबस्ताकरिता सहकार्य मिळत आहे, वैष्णवांची सेवा करण्यास समितीचे पोलीस मित्र वारीमध्ये सदैव तत्परतेने कार्यरत असतात, सलग दोन वर्ष कोविड संक्रमनामुळे पायी वारी होऊ शकली नाही. परंतु वृक्ष संवर्धनाचा वसा समितीच्या स्वयंसेवकांनी सोडला नाही. त्यामुळे हरित वारीमध्ये यंदासुद्धा खंड पडला नाही.”
या निमित्ताने आज रोजी हरित वारीमध्ये कार्यरत असणारे पोलीस हवालदार राजाराम शेळके,विजय मुनोत, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण,सुनिल चौगुले, अँड विद्या शिंदे, सतीश देशमुख, सुरेश गावडे, लक्ष्मण इंगवले, राजेश हजारे, राजू येळवंडे, उद्धव कुंभार, राम सुर्वे, संदीप सकपाळ, अंकुश माने,कु, साक्षी पवार, मंगेश सकपाळ, मंगेश घाग, अभिजीत जोशी, विशाल शेवाळे, तेजस सापरिया, जयेंद्र मकवाना, राजेश बाबर,कपिल पवार,सतीश मांडवे, नितीन मांडवे,अजय घाडी यांचा आयुक्तांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.