- ‘शहराची पुरती इज्जत काढणे म्हणजे काय? ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत घडले’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२१) :- ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राच्या अग्रलेखामधून भाजपावर खोचक शब्दांमध्ये टीका करण्यात आली आहे.“बुधवारच्या स्थायी समितीच्या सभेत ३२ कोटींच्या टक्केवारीचा हिशोब सुरू असतानाच पोलिसांनी धाड घातली. स्थायी समितीचे अध्यक्ष नितीन लांडगे, त्यांचे पीए ज्ञानेश्वर पिंगळे आणि तीन कर्मचाऱ्यांना अटक केली. ३२ कोटींच्या टक्केवारीचा हिशोब सुरू असतानाच पोलिसांनी धाड घातली. एखाद्या महानगरपालिकेत अशा प्रकारचे धाडसत्र प्रथमच झाले असेल. नाकाने कांदे सोलणाऱ्यांचे त्यामुळे नाकच कापले गेले”, असं या अग्रलेखातून शिवसेनेनं सुनावलं आहे.
पिंपरी चिंचवड पालिकेत घडलेल्या प्रकारामुळे शहराची ‘इज्जत’ गेल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. “भाजपाची अवस्था म्हणजे मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली अशी झाली आहे. या पक्षाला मिळेल त्या मार्गाने पैसे कमावण्याचे म्हणजे भ्रष्टाचाराचे कधीच वावडे नव्हते. हेच लोक ऊठसूट मुंबई पालिकेवर निशाणा साधीत असतात. पण स्वत:च्या खुर्चीखाली काय जळतंय त्याचा मात्र त्यांना विसर पडतो. एखाद्या शहराची पुरती इज्जत काढणे म्हणजे काय, ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत घडले”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांमधील विद्यमान कारभाराविषयी सांगण्यासारखे खूप आहे. पण या महान शहरांची इज्जत जाईल, म्हणून पूर्णविराम देतो”, असं अग्रलेखात नमूद केलं आहे.