- नियोजनशून्य कारभाराला जबाबदार मनोज सेठिया यांची हकालपट्टी करा..
- राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ सप्टेंबर २०२१) :- केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी विकास प्रकल्पांतर्गत पिंपळे सौदागर येथील रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे पीके चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. हिंजवडी आयटी हबशी महत्वाची कनेक्टीव्हिटी असलेल्या या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे वाहतुकीचा अक्षरषः बट्ट्याबोळ झाला आहे. ही कोंडी फोडण्यासाठी राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांनी मंगळवारी (दि. ७) सायंकाळी प्रत्यक्ष मैदानात उतरून चौकातील वाहतुकीला मार्ग मोकळा करून दिला. नियोजनशून्य कामकाज करणारे कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेअंतर्गत राबविण्यात येणा-या केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी विकास प्रकल्पांत पिंपळे सौदागरचा समावेश आहे. त्यांतर्गत पिंपळे सौदागर येथील रस्ते, फुटपाथ, जॉगींग ट्रॅक आदी कामे सध्या युध्दपातळीवर सुरू आहेत. पीके चौकात गेली तीन महिने रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाला प्रशासनाकडून दिरंगाई होत आहे. ऐन चौकात रस्ता निमुळता झाल्यामुळे वाहनांना दाटीवाटीने पुढे मार्गस्त व्हावे लागत आहे. भोसरी ते हिंजवडी आणि हिंजवडी ते भोसरीला जोडला जाणारा हा महत्वाचा रस्ता आहे. रस्त्याचे काम अर्धवट असल्यामुळे चौकात वाहतुकीचे अक्षरषः तीन तेरा वाजल्याचे पहायला मिळत आहेत. त्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
नेहमीप्रमाणे मंगळवारी देखील पीके चौकात सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. याठिकाणी वाहतूक पोलीस नसल्यामुळे कित्येक तास वाहतूक पूर्ववत होण्यास वेळ लागला. पीके चौकातून पुढे कोकणे चौक आणि पाठीमागे गोविंद चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा कार्यकर्ते संदीप काटे यांनी आपल्या सहका-यांना घेऊन पीके चौकात पावसात भिजत वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत केली. त्यानंतर वाहतुकीला मार्ग मोकळा झाला. प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
अपघात झाल्यास मनोज सेठिया जबाबदार राहतील – काटे…
महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाकडून पिंपळे सौदागर येथील स्थापत्य विषयक कामकाज पाहण्यासाठी कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांच्या नियोजनशून्य कारभारामुळे याठिकाणची विकास कामे संत गतीने सुरू आहेत. याठिकाणी लक्षपूर्वक कामे केली जात नसल्यामुळे या कामांना दिरंगाई होत आहे. त्यामुळेच वाहतूक कोंडी होत असून सामान्य नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघात होऊन कोणी दगावल्यास त्याला मनोज सेठिया यांनाच जबाबदार धरण्यात येईल. नियोजनशून्य कामकाज करणा-या सेठियांची आयुक्त राजेश पाटील यांनी त्वरीत हकालपट्टी करावी, अशी मागणी काटे यांनी केली आहे.
हिंजवडी आयटी पार्कला जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे. स्मार्ट सिटीच्या विकास कामांमुळे काही ठिकाणी बॅरिकेड्स लावले आहेत. पीके चौकात रस्ता अरुंद झाल्यामुळे वाहनांना ये-जा करण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. याठिकाणी वाहतूक पोलिसांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून वाहतूक सुरळीत होण्यासाठी मदत करावी. जेणेकरून कामगारांना कामाच्या ठिकाणी पोहचायला वेळ लागणार नाही. तसेच, पादचा-यांना नाहक त्रास सहन करण्याची वेळ येणार नाही.
– मा. संदीप काटे, युवा कार्यकर्ते, राष्ट्रवादी कॉंग्रेस...