- ओबीसी उमेदवारीबाबत महत्वाचे भाष्य..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ सप्टेंबर २०२१) :- येत्या वर्षभरात आणखी आठ महानगरपालिकांची मुदत संपणार आहे. त्यामुळे त्यांच्या निवडणुका घ्याव्या लागतील. त्याशिवाय गेल्या वर्षी करोनामुळे व काही न्यायालयीन प्रकरणांमुळे पुढे ढकलाव्या लागलेल्या नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, औरंगाबाद व कोल्हापूर या महापालिकांच्या निवडणुकाही व्हायच्या आहेत. त्याचबरोबर २५ जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजी-माजी आमदारांची बैठक मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पार पडली. या बैठकीला अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी ओबीसी राजकीय आरक्षणाचा प्रश्न मांडण्यात आला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी पक्षाचं म्हणणं प्रसार माध्यमांसमोर मांडलं.
“आपल्या बऱ्याच काळ निवडणुका टाळता येत नाहीत. एखादा कायदा करून सर्व पक्षांना एकजूट करून, एकमत करून आरक्षण देता येते का?, हे पाहावं लागेल. ही सगळी परिस्थिती असताना निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांची भूमिका सुप्रीम कोर्टात मांडलेली आहे. करोनाची स्थिती नियंत्रणात असताना ते निवडणुका घेऊ शकतात. अशी भूमिका ते मांडत आहेत.
सुप्रीम कोर्टाने आदेश दिला निवडणुका घेतल्या पाहीजेत. जर दुसरा पर्याय उरला नाही. तर रिक्त झालेल्या ओबीसी जागांवर ओबीसी उमेदवार देण्याचा निर्णय पक्षाचा झाला आहे”, असं राष्ट्रवादी नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं. “जो पर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी आमची भूमिका आहे. पण एखादा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिल्यास पक्षाचा निर्णय असा राहील”, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.