- यंदाही तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रौत्सव साधेपणानेच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४. सप्टेंबर २०२१) :- कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने अजूनही मंदिरे बंदच आहेत. त्यामुळे यंदाही तुळजाभवानीचा शारदीय नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
त्यामुळे यंदाही भाविकांना तुळजापुरात दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही, उस्मानाबाद जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट हा राज्यातील टॉप फाईव्हमध्ये असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच पाच दिवसांपूर्वी केंद्र सरकारच्या कॅबिनेट सचिवांनी घेतलेल्या बैठकीत जिल्हाधिका-यांना तिसरी लाट १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत येण्याची शक्यता वर्तविली आहे.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पुजारी मंडळाच्या प्रमुख पदाधिका-यां सोबत झालेल्या बैठकीत नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले. या कालावधीत भाविकांना मंदिरात प्रवेश नसणार आहे; मात्र देवीचे नित्योपचार व धार्मिक कार्यक्रम होतील.