- नवजीवन विद्यालयातील दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक मार्गदर्शन..
- कॉलेजचे विभागप्रमुख भागवत सर, प्रतिक्षा डफळ यांची घौडदौड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२१) :- चिखलीतील आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट या संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय वर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यामधील शेवगाव तालुक्यातील दहिगाव-ने येथील नवजीवन माध्यमिक तांत्रिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘ व्यक्तिमत्त्व विकास ‘ ‘ज्ञानसमृद्धी निबंध स्पर्धा २०२२’ तसेच व्यावसायिक मार्गदर्शन शिबिरास विद्यार्थ्यांचा उस्फुर्त सहभाग लाभला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य उगलमुगले, उपप्राचार्या उषा धुमाळ, शाळेतील शिक्षकवृंद, आयआयबीएम कॉलेजचे विभागप्रमुख अमोल भागवत सर, प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ, किरण वाघमारे, अनिकेत बिचुकले, विश्वनाथ साठे, शाबाज काजी आणि सहकारी वर्ग यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवजीवन विद्यालयाचे प्राचार्य उगलमुगले सर यांनी हॉटेल मॅनेजमेंट व व्यावसायिक अभ्यासक्रमाबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थीही व्यवसायिक शिक्षणाच्या माध्यमातून परदेशापर्यंत झेप घेऊ शकतो, असा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
आयआयबीएम कॉलेजचे विभागप्रमुख भागवत सर म्हणाले, सध्या ऑफलाईन शिक्षण बंद असले तरी, ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थी व शिक्षकांमधील दुरावा कमी झाला आहे. विद्यार्थ्यांनी कोरोनासारख्या कठीण काळात मानसिक तणाव दूर करून जिद्दीने आपले उद्दिष्ट गाठले पाहिजे. त्यासाठी गेल्या आठ वर्षांपासून आयआयबीएम कॉलेज ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिशादर्शन करीत आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास व्हावा व स्पर्धात्मक युगामध्ये वावरण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळावी, या उद्देशाने शहरी व ग्रामीण भागातील विद्यालय व महाविद्यालयांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबवित आहे.
प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ यांनी आयआयबीएम कॉलेजच्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी स्वतःमधील आत्मविश्वास वाढवावा, संकटांना न घाबरता भविष्यात असणाऱ्या विविध संधी व स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा, तसेच हॉटेल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमाबद्दल व त्यामधील नोकरीच्या संधी याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पानकर सर तर, नियोजन काकासाहेब घुले, डॉ. रमेश खैरे, मकरंद बार्गुजे, प्रा. मधुकर घाडगे, बाळासाहेब मंडलिक, डॉ नाब्दे सर, महिमुद पठाण व आभारप्रदर्शन सिकंदर शेख यांनी केले.