- पिंपळे सौदागर वासियांकडून मशालीचे जोरदार स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ ऑक्टोबर २०२१) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकातून चार विजयी मशाल प्रज्वलित करून राष्ट्रीय स्तरावर वर्षभराच्या उत्सवांची सुरुवात झाली आहे. चारपैकी एका विजयी मशालीचे आज रविवारी (दि. ३) रोजी पिंपरी चिंचवड शहरात आगमन झाले. पिंपळे सौदागर येथील रोझ लॅन्ड सोसायटीत या मशालीला मानवंदना देत, नागरिकांनी जोरदार स्वागत केले. यावेळी परिसरातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय सशस्त्र दलांच्या सर्वात मोठ्या लष्करी विजयाच्या ऐतिहासिक कामगिरीला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपल्या शूर सैनिकांच्या स्मरणार्थ आणि त्यांच्या अभूतपूर्व पराक्रम, शौर्य आणि बलिदानाची आठवण म्हणून संपूर्ण देश ‘स्वर्णिम विजय वर्ष’ साजरे करत आहे.
नागरी प्रशासनासह दक्षिण कमांड ०१ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत पुण्यातील अनेक ठिकाणी पहिल्यांदाच महिन्याभराचा उत्सव आयोजित करणार आहे. ०१ ऑक्टोबर रोजी सरहद महाविद्यालय, कात्रज येथे विजय मशालीचे भव्य स्वागत झाले. पुण्यातील मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी, मशाल समारंभांसाठी शिवाजीनगर पोलीस परेड मैदानावर नेली जाईल. अखेरीस ३१ ऑक्टोबर रोजी, विजय मशाल नाशिक मार्गे नवी दिल्लीच्या राष्ट्रीय युद्ध स्मारक या रवाना होईल. चार मुख्य दिशांना प्रवास करणाऱ्या या विजयी मशाल १६ डिसेंबर २०२१ रोजी पुन्हा एकदा नवी दिल्ली येथे एकत्र येणार आहेत.