- सर्वपक्षीय नेत्यांचे आवाहन; पिंपरीत सोमवारी आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ ऑक्टोबर २०२१) :- लखीमपूर येथे शेतकरी आंदोलकांवर भाजपाच्या मंत्री पुत्राने धावते वाहन घातले. यात पाच शेतक-यांचा दुर्दैवी अंत झाला. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यासाठी पिंपरीमध्ये शनिवारी सर्वपक्षिय पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सोमवारी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत आंदोलन करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, शिवसेनेचे शहराध्यक्ष ॲड. सचिन भोसले, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर तसेच कामगार संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
मागील सात वर्षांपासून केंद्रात भाजपाची सत्ता आहे. देशभरातील जनतेला फसवी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने देशातील लोकशाहीचा गळा घोटणारे कामगार आणि शेतकरी विरोधी निर्णय घेतले. देशाच्या लोकशाहीचे प्रवित्र मंदिर असणा-या संसदेमध्ये विरोधी पक्षांना साधी चर्चा करण्याचीही संधी मोदी – शहा यांच्या हुकूमशाही सरकारने दिली नाही. कोणाचीही मागणी नसतानाही हे काळे कायदे आणले. अशा हुकूमशाही सरकारच्या धोरणामुळे देशातील सर्व थरातील सर्व समाज घटक भितीच्या छायेखाली वावरत आहेत. कुंभकर्णाच्या झोपेचे सोंग घेतलेल्या या केंद्र सरकारला जाग यावी, यासाठी सोमवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये शहरातील जनतेने सहभागी व्हावे. तसेच पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील सर्व औद्योगिक कारखाने या दिवशी बंद ठेवावेत. नागरिकांनी पिंपरीतील आंदोलनात उपस्थित राहून केंद्र सरकार विरुध्द तीव्र निषेध नोंदवावा असे आवाहन यावेळी सर्वपक्षीयांनी केले.