- महापालिकेच्या ‘स्वच्छाग्रह’ या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ ऑक्टोबर २०२१) :- स्वच्छता असते तिथे लक्ष्मी नांदते असे म्हटले जाते. आपल्या शहराची प्रगती करायची असेल, विकासाची लक्ष्मी नांदवायची असेल तर शहर विकसित होत असताना त्या प्रमाणात स्वच्छता असणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी मंगळवारी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छाग्रह या स्वच्छता अभियानाचा शुभारंभ चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अभियानाचा लोगो व थीम सॉंगचे देखील अनावरण महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त राजेश पाटील, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे आदी उपस्थित होते
महापौर पुढे म्हणाल्या, शहरे विकसित होत असताना शहरातील लोकांचे राहणीमान, जीवनमान, शिक्षण हे सर्व विकसित होत जाते. नागरिकांच्या गरजा वाढतात. राहण्यासाठी प्रत्येक जण मजल्यावर मजले वाढवतो. शहरातील जमिनीचे क्षेत्रफळ वाढू शकत नाही .त्यामुळे आहे त्याच जागेत आता आपल्याला विकासाचे, स्वच्छतेचे मुद्दे शोधावे लागणार आहेत. त्यामुळे यापुढील काळात स्वच्छतेचे महत्त्व नक्कीच वाढलेले आहे.
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, 'स्वच्छता' हे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुरू केलेले एक प्रकारचे जनआंदोलन आहे. याची सुरुवात आज महापौर माई ढोरे यांच्या हस्ते झालेली आहे. हे "जनआंदोलन" शहराच्या स्वच्छतेसाठी उचललेले एक मोठे पाऊल आहे. ज्यामध्ये प्रत्येकाने आपला सहभाग नोंदवायचा आहे. यामध्ये नागरिक, उद्योजक, व्यापारी, विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे योगदान ठरणार आहे. भारत सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये गेली अनेक वर्षे प्रथम येणा-या इंदौर शहराचा विचार केला तर लोकसंख्येच्या बाबतीत हे शहर आपल्या जवळपास आहे. मात्र सोयी-सुविधा आपल्या शहरात तुलनेने अधिक असून देखील आपण स्वच्छतेच्या बाबतीत पिछाडीवर आहोत. त्यामुळे इंदौरसारख्या शहरापासून प्रेरणा घेऊन आपल्याला मार्गक्रमण करायचे आहे. त्यामुळे आजपासून आपण सुरु केलेल्या स्वच्छाग्रह या स्वच्छता अभियानात प्रत्येक नागरिकाने आपला सहभाग नोंदवायचा आहे ज्यामध्ये गृहिणींचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. आयुक्त पुढे म्हणाले, स्वच्छतेचा संकल्प सुरू करताना आपल्याला स्वतःच्या काही सवयींमध्ये बदल करावा लागणार आहे. एखाद्या टपरीपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत प्रत्येकाने कचरापेटी आपल्या आजूबाजूच्या परिसरात ठेवण्याची सवय लावून घ्यायची आहे. जिथे मन मानेल तेथे कचरा टाकण्याची सवय आपल्याला बदलायची आहे जेणेकरून स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या सगळ्यांचा सहभाग नोंदवला जाईल आणि यातूनच शहर स्वच्छतेच्या बाबतीत आपल्याला पुढचे पाऊल टाकता येईल. याशिवाय नदी पुनरुज्जीवन, सांडपाणी व्यवस्थापन हे या योजनेतील पुढचे टप्पे आपल्याला पूर्ण करायचे आहेत. असेही आयुक्त पाटील यांनी नमूद केले.या सर्व अभियानामध्ये आजूबाजूच्या छोट्या ग्रामपंचायती, कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्वांना आपल्याला बरोबर घेऊन काम करायचे आहे असेही त्यांनी सांगितले.स्वच्छता अभियान ही आपल्या शहरासाठी एक मोठी संधी आहे.या संधीमध्ये निर्धार करून आपल्याला आपले शहर विकसित करण्याबरोबरच स्वच्छ ठेवायचे आहे असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तर आभार अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी मानले.