न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२१) :- चार लोकांनी एकत्र येऊन एक विचाराने उद्योग, व्यवसाय सुरु केल्यास निश्चितच भरभराट होते, असे प्रतिपादन माजी केंद्रिय मंत्री लोकनेते शरद पवार यांनी केले.
शनिवारी (दि. १६ ऑक्टोबर) प्राधिकरण मोशी, सेक्टर नं. ४, स्पाईन रोड येथे ‘पर्ल बॅंक्वेट’ हॉलच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे, बापूसाहेब भेगडे, शिवसेना पुणे सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, संभाजी ब्रिग्रेड महाराष्ट्र अध्यक्ष प्रविणदादा गायकवाड, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी नगरसेवक श्रीपाद बेलसरे तसेच कुमूद बेलसरे, पर्ल बँक्वेटचे संचालक संदिप बेलसरे आदी उपस्थित होते.
जुन्या आठवणींना उजळा देताना शरद पवार म्हणाले की, पुर्वी लग्न समारंभ चार – पाच दिवस चालायचे. व-हाडी मंडळी चार – पाच गाड्यांमध्ये यायचे. त्यांचा पाहुणचार करण्यासाठी वधुपित्याला खुप खर्च करावा लागत असे. त्यात वेळ देखिल जात होता. आता धावपळीच्या जगात सर्वांनीच वेळेची आणि पैशांची बचत करणे आवश्यक आहे. त्यामुळे लग्न आणि इतर छोट्या कार्यक्रमांसाठी ‘पर्ल बँक्वेट हॉल’ सारख्या छोट्या हॉलची गरज ओळखून संदिप बेलसरे आणि सहका-यांनी सुरु केलेल्या या व्यवसायाची भरभराट होईल. त्याचा या परिसरातील नागरिकांनाही उपयोग होईल.
तसेच ३८ वर्षांपुर्वी याच भागातील नागरिकांनी आपल्याला देशाच्या लोकसभेत ‘हायस्ट’ मताने निवडून दिले होते. याचा संदर्भ देताना ते म्हणाले की, स्व. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान राजीव गांधी यांना आणि नंतर मला पुर्ण हिंदुस्थानात सर्वाधिक मताधिक्य मिळाले होते. आजचे वयस्कर नेते त्यावेळी तरुण होते. या भागाचा विकास करणे माझे कर्तव्य होते. माझ्या नंतर अजित पवारांनी येथे अधिक लक्ष घातले. अनेक मोठे विकास प्रकल्प येथे उभे केले. आता पुन्हा एकदा या पिंपरी चिंचवडचा विकास आणखी वेगाने करण्यासाठी येथिल नागरिकांची साथ हवी अशी साद आगामी सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर शरद पवार यांनी नागरिकांना घातली.
स्वागत माजी नगरसेवक श्रीपाद बेलसरे, सुत्रसंचालन संदिप बेलसरे आणि आभार संजय भोसले यांनी मानले.