- शहरातील रक्ताच्या तुटवड्याची दखल घेत, ३९ कर्मचाऱ्यांचे रक्तदान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३. नोव्हेंबर २०२१) :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचा १५ दिवसांपासून संप सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद काळात रक्तदान करून आंदोलन केले.
या अनोख्या आंदोलनाद्वारे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. वल्लभनगर आगारातील या संपात सहभागी असणाऱ्या ३९ कर्मचाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
या शिबिरात चालक, वाहक, यांत्रिक अधिकारी आणि प्रवाशांनी सहभाग घेतला. आजपर्यंत परिश्रम करून एस.टी. महामंडळाला सांभाळणाऱ्या या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या शरीरातील रक्तदान करून एक वेगळा संदेश दिला आहे. आता तरी प्रशासन यांच्या मागण्यांकडे लक्ष देईल का? असा सवाल कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला.
आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली म्हणून एसटी कर्मचाऱ्यांनी रक्ताचे पाणी करून लोकांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात भासत असलेला रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान करण्याचा निर्णय घेतला असल्याची भावना कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवली. त्याच पद्धतीने शासनाने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अशी मागणी संपकरी रक्तदात्यांनी केली.