न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जाने.) :- बीएसएनएल सल्लागार समितीची बैठक नुकतीच पुणे येथे संपन्न झाली. पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूरसंचार यंत्रणेत आवश्यक ते बदल व उपाय-योजनांचा यावेळी आढाव घेण्यात आला. यावेळी सदस्य दत्तात्रय भालेराव, बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी व आदी उपस्थित होते.
बीएसएनएल दूरसंचार निगमचे सदस्य दत्तात्रय भालेराव यांनी या बैठकीत बीएसएनएलच्या कामकाजासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले. यावेळी बोलताना भालेराव म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील मासुळकर कॉलनी येथे बीएसएनएलची केबलच नाही. त्यामुळे संस्थेची सेवा विस्कळीत होत आहे. सेवा चांगली असूनही, अनेक ग्राहक इतर खाजगी दूरसंचार संस्थेकडे आकर्षिले जात आहेत. त्यामुळे संस्थेचे नुकसान होत आहे. तसेच ग्रामीण भागातील भीमाशंकर येथे ओएफसी नसल्याचा प्रश्नही भालेराव यांनी यावेळी उपस्थित केला.
यावर स्पष्टीकरण देताना प्रशासनाने सांगितले की, बीएसएनएलच्या वतीने सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात असून, भीमाशंकर व परिसरात ओएफसीकरीता वन विभागाकडून परवानगीसाठी प्रयत्न सुरु आहेत. खासदार आढळराव पुढाकारासाठी प्रयत्नशील आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीचे मिनिट्स मिळाले असून, पत्र प्राप्त झाले नाही. तसेच शहरात केबल खोदकामाकरीताचे महापालिकांचे शुल्क अवाजवी असल्यामुळे प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे बीएसएनएलच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. यावर भालेराव यांनी बीएसएनएलच्या संथगतीच्या कारभारावर कडक ताशेरे ओढले असून, बीएसएनएलच्या ऱ्हासास सुस्त व संथ प्रशासकीय कारभार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.











