- पिंपरीत आंबेडकरी कार्यकर्त्यांचा पेढे वाटून जल्लोष…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०२१) :- विजयस्तंभ व परिसराच्या विकास व सुशोभीकरण कामाचा १०० कोटींचा बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतेच त्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या निर्णयाचे पिंपरी चिंचवड मधील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी पेढे वाटून स्वागत केले. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हा कार्यक्रम पार पडला.
भीमा-कोरेगाव संघर्ष समिती अध्यक्ष आणि भीमा-कोरेगाव हल्ला प्रकरणातील प्रथम फिर्यादी अनिता सावळे व अंजना गायकवाड , यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महाराष्ट्राचे सचिव बाळासाहेब भागवत, रिपाई वाहतूक आघाडीचे अध्यक्ष अजीज शेख, शिवशंकर उबाळे, नीलेश निकाळजे आदीसह आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.
विजयस्तंभ व परिसर विकासकामांना गती देण्यासाठी भूसंपादन तातडीने करा, ३० टक्के निधी त्वरित वितरित करण्याचे निर्देश सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत. निर्देश १ जानेवारी, शौर्यदिन अभिवादन कार्यक्रमाच्या आयोजन व नियोजनाची बैठक धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या वेळी हे निर्देश दिले आहेत.
माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या वतीने घेतलेला निर्णय हा आंबेडकरी समाजाला न्याय देणारा आहे. त्यांच्या लढ्याची प्रेरणा जोपासण्याचे काम सरकारने केले. भविष्यात हे राष्ट्रीय स्मारक होणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार लांडे म्हणाले.
बाबा कांबळे म्हणाले की, विजयस्तंभ ही एक ऐतिहासिक घटना आहे. लाखो अनुयायांचे प्रेरणा स्थळ आहे. दर वर्षी या ठिकाणी लाखो अनुयायी दर्शनासाठी येतात. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था येनाऱ्या अनुयायांची सोय करत असतात. मात्र आता राज्य शासनाने पुढाकार घेतला हे अभिनंदन पर आहे. त्वरित पुढील कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे बाबा कांबळे म्हणाले.
















