- तब्बल ६ लाख २२ हजारांचा मुद्देमाल पोलीसांकडून हस्तगत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२२) :- पोलीस असल्याची बतावणी करुन सोन्याच्या दागिण्यांची चोरी करणारी इराणी टोळी अखेर पिंपरी चिंचवड पोलीसांच्या जाळ्यात सापडली आहे. वाकड पोलीसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या असुन १२५ ग्रॅम सोन्याच्या दागिण्यांसह दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकुण ६ लाख २२ हजाराचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे.
पिंपरी चिंचवडसह पुणे शहरामध्ये देखील या टोळीने धुमाकुळ घातला होता. हैदर तहजिब सय्यद (वय ५५ वर्ष, रा. पाटील नगर, सुपर स्टार बेकरी मागे, गल्ली नं. ५, रुम नं. १०३६, आंबिवली पश्चिम, ता कल्याण, जि. ठाणे, युनुस साबुर सय्यद (वय ४६ वर्ष, रा. पाटील नगर, सुपर स्टार बेकरी मागे, गल्ली नं. ५, रूम नं. १०३६, आंबिवली पश्चिम, ता कल्याण, जि. ठाणे), गाझी रफिक जाफरी (वय ३५ वर्ष, रा. आंबिवली पश्चिम, इंदिरा नगर, वाल्मी शाळेच्या मागे, मंगलमय झोपडपट्टी, ता. कल्याण, जि. ठाणे), हैदर उर्फ लंगड्या पप्पू सय्यद इराणी (वय ३५, आंबिवली, ता. कल्याण, जि. ठाणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या चोरट्यांची नावे आहेत. पोलीसांनी तीन आरोपींना अटक केली असुन चौथा आरोपी हैदर उर्फ लंगड्या पप्पू सय्यद इराणी पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी लक्ष्मण विठ्ठलराव देशमुख (वय ६४ वर्ष, रा. द्वारका नगर, त्रिकोणी मैदान, नागपूर) यांनी वाकड पोलीस फिर्याद दिली आहे.
पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथे राहणारे ज्येष्ठ नागरिकाकडील सोन्याचे दागिणे वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चितळे बंधू स्विट मार्ट जवळ, कोकणे चौक, रहाटणी येथे तीन अनोळखी इसमांनी लंपास केले असल्याची घटना (ता ४) जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता घडली होती. विशेष बाब म्हणजे या इसमांनी अंगावर पोलीसांचा युनिफॉर्म परिधान केला होता. दरम्यान, आपले सोने पिशवीमध्ये जपुन ठेवा. असे सांगत त्यांचा विश्वास संपादन करुन सोने पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने हातचलाखी करुन लंपास केले होते. या जेष्ठ नागरिकाचे एकुण ५५ ग्रॅम वजनाचे २ लाख २० हजार रुपये किमतीच्या सोन्यावर या चोरट्यांनी डल्ला मारला होता. वाकड पोलीस ठाणे आणि निगडी पोलीस ठाणे येथे देखील अशाच प्रकारे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन वाकड पोलीसांनी तपास सुरु केला. घटनास्थळावरील सीसी टिव्ही फूटेजची बारकाईने पाहणी केली. दरम्यान, आरोपींच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीवरुन ही टोळी इराणी असल्याची बाब समोर आली. इराणी वस्ती असलेल्या पाटील इस्टेट तसेच लोणी काळभोर या परीसरात जावुन माहिती घेतली असता येथील लोकांनी या गुन्हा केला नसल्याचे तसेच हे गुन्हे ठाणे, कल्याण परीसरात राहणाऱ्यांनी केला असल्याची खात्रीशीर माहिती पोलीसांकडे प्राप्त झाली. तपास पथकाने पुन्हा सीसी टिव्ही फूटेज तपासले असता गुन्हा केल्यानंतर आरोपी हे दोन दुचाकीवरुन मुंबईच्या दिशेने पळुन गेलेले दिसुन आले. तपास पथकातील पोलीस हवालदार जावेद पठाण यांनी त्यांच्या खबऱ्याला फुटेज दाखवुन आंबिवली कल्याण, ठाणे येथील आरोपींची नावे निश्चित केली. या आरोपींमधील हैदर सय्यद हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. इराणी वस्तीत जावुन आरोपींना पकडणे हे पोलीसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले होते. कारण अनेकदा आरोपींना अटक करताना या समाजातील महिला आक्रमक होतात. वस्तीमधुन आरोपीला बाहेर घेवुन जाताना प्रतिकार करतात. परिणामी, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याची अनेक उदाहरणे आहेत. दोन स्वतंत्र पथके आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले. दरम्यान तांत्रिक विश्लेषन आणि मोबाईल लोकेशन च्या आधारे आरोपी हे बनेली, कल्याण भागातील एका हॉटेलच्या पाठीमागे बसले असल्याची माहिती पथकाला मिळाली. दोन्ही पथकाने छापा टाकुन दोन आरोपींना ताब्यात घेतले. तर तिसऱ्या आरोपीला दलदलीच्या गवताळ भागातील चिखलात लपुन बसला असताना ताब्यात घेतले. न्यायालयाने आरोपींना बुधवार (ता. १२) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलीस कोठडीत आरोपींनी वाकड ४, हिंजवडी १, निगडी १ आणि मानपाडा ठाणे शहर १ असे एकुण ७ गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाले आहे.