- नाना पटोले यांची पिंपरी चिंचवडमध्ये भव्य परिवर्तन दुचाकी रॅली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२२) :- भाजपा हा भ्रष्टाचारीच पक्ष आहे. भाजपाच्या नेत्यांनी खोटं बोलून देशात सत्ता मिळवली. आज देश विकण्याचं काम भाजपाचे दिल्लीतील आका करीत आहेत. त्यांची मानसिकता काय आहे हे भारतातील नागरीकांनी ओळखले आहे अशी टिका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
शनिवारी (दि. ५) नाना पटोले यांनी रावेत ते दापोडी अशी भव्य परिवर्तन दुचाकी रॅली काढली. यावेळी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष डॅा. कैलास कदम, युवक शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा सायली नढे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेवक सद्गुरू कदम,आदी उपस्थित होते.
किवळे – मामुर्डी – रावेत – वाल्हेकर वाडी – चापेकर चौक – चिंचवड स्टेशन – मोरवाडी चौक – अजमेरा कॉलनी – नेहरुनगर – संत तुकाराम नगर – वल्लभनगर – नाशिक फाटा – कासारवाडी – फुगेवाडी – दापोडी रॅलीच्या या मार्गावर ठिकठिकाणी फटाके फोडून स्वागत करण्यात आले. अजमेरा कॉलनी येथे बीएसपीचे शहराध्यक्ष सुरेश गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार राहुल ओव्हाळ, डॉ. मनिषा गरुड, डॉ. प्रिती गुप्ते, सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे आदींसह अनेक कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.
नाना पटोले म्हणाले की, कॉंग्रेसची विचारधारा मानणारा मोठा वर्ग पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये आहे. त्यांच्या पाठिंब्याने पिंपरी आणि पुण्यामध्ये सत्ता आणण्याचे स्वर्गवासी प्रा. रामकृष्ण मोरे यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यापुर्वी पिंपरी चिंचवडमध्ये कॉंग्रेसची सत्ता होती. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील भाजपची भ्रष्टाचारी सत्ता उलथून टाकण्यासाठी नागरीक कॉंग्रेसला आशिर्वाद देतील आणि पिंपरी चिंचवड व पुण्यामध्ये कॉंग्रेसची स्वबळावर पुन्हा सत्ता येईल असा आशावाद नाना पटोले यांनी व्यक्त केला.


















