- मार्च-एप्रिलपासून दररोज पाणीपुरवठा होईल?..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२२) :- शहराचा झपाटयाने विकास झाल्याने पाण्याची गरज वाढली आहे. महापालिका पाणी वाढविण्यासाठी प्रयत्न करत आहे. चिखलीतील जलशुद्धीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात असून आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी उचलण्यात येणार आहे. त्यामुळे मार्च-एप्रिलमध्ये दररोज पाणीपुरवठा होईल. तर, आणखी तीन वर्षांनी पाण्याची उपलब्धता वाढे. व्यवस्थित नियोजन झाल्यास संपूर्ण शहराला चोवीस तास पाणीपुरवठा सुरू होईल, असा विश्वास महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता प्रवीण लडकत यांनी शुक्रवारी (दि. ११) व्यक्त केला.
निगडीतील जलशुद्धीकरण केंद्रात लडकत यांनी याबाबतची माहिती दिली. या वेळी लडकत म्हणाले, चिखली जलशुद्धीकरण केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. निगडीतील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमताही १०० एमएलडीने वाढवत आहोत. पुढील दोन ते अडीच वर्षात आंद्रा, भामा आसखेडमधून ५०० एमएलडी वाढीव पाणी मिळेल. नियोजनबद्ध काम झाल्यास संपूर्ण शहराला चोवीस तास पाणीपुरवठा होईल. पुढील ३० वर्षे पाणी पुरेल एवढी उपलब्धतता वाढविली जात आहे. २०१० ते २०२२ पाणी वाढले नाही. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्याची वेळ आली. पवना जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लागला नाही.
भविष्यात पवना आणि मुळशी हे दोन्ही धरणे जोड़ता येतील. बोगद्यातून पाणी घेता येईल. ९.५५ किलोमीटर अंतर आहे. हे काम खर्चिक आहे. १०० एमएलडी पाणी आणण्यासाठी सुमारे २५० ते ३०० कोटी रुपये खर्च येतो. महापालिकेला पाणीपट्टीतून केवळ ४० ते ४५ कोटी रुपये उत्पन्न आहे. निगडी, प्राधिकरणातील सेक्टर २६ मध्ये मागील सहा महिन्यांपासून स्मार्ट सिटीअंतर्गत ९ हजार स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहेत. एका मीटरची किंमत ३ हजार रुपये आहे. रहिवासी, व्यावासायिक भागातही हे मीटर बसविण्यात येत आहेत. ९ हजारांपैकी ७ हजार ५०० मीटर बसविण्यात आले आहेत. त्याचे अद्याप रिडींग सुरू झाले नसल्याचे लडकत यांनी सांगितले.
मानांकनाप्रमाणे एका व्यक्तीला दिवसाला १३५ लीटर पाणी वापरण्यास दिले जाते. पण, महापालिकेने केलेल्या तपासणीत ६० टक्के लोक २०० तर २८ टक्के लोक दिवसाला ५०० लीटर पाणी वापरत असल्याचे आढळून आले. त्यानंतर केलेल्या तपासणीत ५४ टक्के लोक २०० तर १८ टक्के लोक ५०० लीटर पाणी वापरत होते. त्यामुळे चोवीस तास पाणीपुरवठा करुनही नागरिक १३५ लीटरपेक्षा जास्त पाणी वापरत असल्याचे ते म्हणाले.