- ‘यशस्वी’ संस्थेच्या आयआयएमएसच्या वतीने आयोजित ‘पडसाद अर्थसंकल्पाचे’ या विषयावरील व्याख्यान संपन्न
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रु.) :- एमबीएच्या विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्प समजून घेऊन त्याचे परिणाम म्हणून व्यापारात, अर्थव्ययवस्थेवर आणि समाजजीवनावर काय काय आणि कशा पद्धतीने बदल होतात याचा बारकाईने अभ्यास करावा, असे मत प्रसिद्ध साई मनोहर प्रभू यांनी व्यक्त केले.
ते आज मंगळवार (दि. ५) रोजी चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिटयूट मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने आयोजित ‘पडसाद अर्थसंकल्पाचे’ या विषयावरील मार्गदर्शनपर व्याख्यानात बोलत होते.
याप्रसंगी बोलताना त्यांनी अर्थसंकल्प म्हणजे काय, अर्थसंकल्प तयार होण्याची प्रक्रिया, अर्थसंकल्पाची व्याप्ती, आयकर, आर्थिक तूट, अप्रत्यक्ष कर, आर्थिक धोरण अशा विविध संकल्पना उदाहरणांसह समजावून सांगितल्या.
संस्थेच्यावतीने विद्यार्थ्यांना ‘अर्थसंकल्प’ व्यवस्थित समजून घेता यावा यासाठी ३१ जानेवारीला अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी प्रा. गुरुनाथ वाघाळे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तसेच १ फेब्रुवारीला लोकसभेत अर्थसंकल्प सादर होत असतानाचे थेट प्रसारणही दाखविण्यात आले. तसेच विविध वर्तमानपत्रांतून आलेले अर्थसंकल्पाचे स्पष्टीकरण, लेख हे सुद्धा विद्यार्थ्यांना दाखवून त्यांच्यात समूह चर्चा घेण्यात आली. या दोन्ही सत्रांनंतर नेमका अर्थसंकल्प समजून घ्यावा आणि विद्यार्थ्यांच्या शंका, प्रश्न यांना जाणकाराकडून उत्तरे मिळावीत म्हणून सनदी लेखापाल साई मनोहर प्रभू यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
अशा प्रकारच्या अभिनव उपक्रमांमुळे विद्यार्थ्यानाही अभ्यासात रुची निर्माण होण्यास मदत होते, असे मत आयआयएमएस संचालक डॉ. मिलिंद मराठे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी संस्थेचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांच्यासह सर्व अध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. महेश महांकाळ यांनी तर आभारप्रदर्शन अपर्णा वाठारे या विद्यार्थिनीने केले. या कार्यक्रमासाठी प्रा. पुष्कराज वाघ, प्रा. सारंग दाणी, अंजली जकाते यांनी विशेष सहकार्य केले.











