न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० एप्रिल २०२२) :- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सहा जणांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून शिफारस केल्याचे वृत्त मंगळवारी दुपारी व्हायरल झाले. या पत्रात चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाच्या नावाचा समावेश होता. पण हे व्हायरल पत्र बोगस असल्याचे राजभवनकडून स्पष्ट करण्यात आल्यानंतर आता सर्वांच्याच आनंदावर विरजण पडले आहे.
आता ते बोगस पत्र आले कुठून, याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी ६ नोव्हेंबर २०२० रोजी हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले होते आणि त्यात सहा जणांची नावे नमूद करून, त्यांना विधान परिषदेवर नियुक्त करण्याची शिफारस राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत करावी, राज्यपालांनी म्हटल्याचाही दावा बातमीत करण्यात आला.
ही सर्व सहा नावे सामाजिक, राजकीय व औद्योगिक क्षेत्राशी निगडित असल्याचेही सांगितले गेले. त्या सहापैकी एकाचे निधन झालेले आहे. या पत्रात आले कुठून, कुणी आणले? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या बनावट पत्राची चौकशी करण्याची मागणी केली. राजभवनातून अशा पद्धतीने बनावट पत्र जातात का?, असा प्रश्नही या निमित्ताने समोर आला आहे. हे पत्र आले कुठून, कुणी आणले आणि कोणत्या व्यक्तीने आणले याचा तपास होण्याची गरज आहे, असेही पटोले म्हणाले.