न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ मे २०२२) :- विद्यार्थ्यांनी करिअर बाबतीत सजग राहत योग्य वेळी निर्णय घेणे महत्त्वाचे असून अनेक वेळा योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळे आपण अनेक संधीना मुकतो. त्यामुळे वाचन व आलेल्या अनुभवाने आपल्या उणीवा जाणून घेत स्वतःला विकसित करणे गरजेचे आहे. तसेच आत्मपरीक्षणातून विकासाची नवीन दिशा मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी आत्मपरीक्षण करत भविष्याच्या दृष्टीने प्रगल्भ असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
‘मोर ओडिशा डायरी: आयुक्तांचा युवकांशी सुसंवाद’ या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
‘मोर ओडिशा डायरी: आयुक्तांचा युवकांशी सुसंवाद’ या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भारतीय प्रशासन सेवेतील कर्तव्यदक्ष अधिकारी राजेश पाटील यांनी आर्थिक स्थिती हलाखीची असताना देखील भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास उपस्थित विद्यार्थ्यांसमोर उलगडला. तसेच ओडिशा राज्यामध्ये काम करत असताना दुर्गम व आदिवासी भागामध्ये आलेली आव्हाने, स्थानिक प्रश्न याविषयी माहिती देताना मयुरभंज जिल्ह्यामध्ये वंचित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ‘राईट टू एज्युकेशन’ अंतर्गत केलेल्या ‘मु बी पडीन’ या अभियानावर प्रकाश टाकला.