- पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून नवीन धोरण?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०२२) :- थेट नळजोडास विद्युत मोटार लावणाऱ्यांवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. जप्त केलेल्या मोटारी दंड भरल्यानंतर परत दिल्यानंतर नागरिक पुन्हा त्यांचा वापर करतात. हा प्रकार रोखण्यासाठी आता जप्त केलेल्या मोटारी दिल्या जाणार नाहीत. तसे नवीन धोरण पाणीपुरवठा विभागाने तयार केले आहे.
वेगात पाणी यावे आणि वरच्या मजल्यावर पाणी चढावे म्हणून काही नागरिक थेट नळास विद्युत मोटार पंप लावतात. त्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी खेचतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळते. पाणी कमी आल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढतात. असे प्रकार मुख्यत: दाट लोकवस्तीमध्ये घडत आहेत. थेट पंप लावून पाणी खेचणाऱ्या घराचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जात आहे.
अर्ज केल्यानंतर मोटार पंप नागरिकांना परत केला जातो. परत मिळाल्याने नागरिक पुन्हा नळास पंप लावून पाणी खेचतात. त्यामुळे परिसरात पुन्हा कमी दाबाने पाण्याची समस्या निर्माण होते. त्यावर उपाय म्हणून जप्त केलेल्या मोटारी पुन्हा न देण्याचा निर्णय पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर त्यावर अंमलबजावणीकेली जाणार आहे. परिणामी, थेट मोटार लावून पाणी खेचण्याचा प्रकारास आळा बसणार आहे.
थेट नळास लावलेल्या विद्युत मोटारी पाणीपुरवठ्याच्या भरारी पथकाकडून कारवाई करून जप्त केल्या जातात. त्या पुन्हा दिल्या जात नाहीत. त्या परत देण्यासंदर्भात स्पष्ट असा नियम नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने नवे धोरण प्रस्तावित केले आहे. त्यात जप्त केलेली मोटार परत दिली जाणार नाही, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. तसेच, नळजोड देताना नळास मोटार लावल्यास कारवाई करण्याबाबची सूचना अर्जावर ठळकपणे नमूद केली आहे, असे सहशहर अभियंत श्रीकांत सवणे यांनी सांगितले.