- दैनंदिन समस्यांचा पोलीस आयुक्तांसमोरच केला उहापोह…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ मे २०२२) :- वाढत्या चो-या ते वाहतूक समस्या अशा नानाविध समस्या शहरातील औद्यागिक संघटना व वाहतूक संघटना यांनी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासमोर मांडल्या. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या वतीने चर्चासत्राचे केले होते. समस्यांचे निराकरण लवकरात लवकर केले जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले. तसेच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले.
चर्चासत्रावेळी उपायुक्त मंचर इप्पर, सहाय्यक आयुक्त सागर कवडे, पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संचालक संजय सातव, विजय खळदकर, प्रमोद राणे, विनोद मित्तल, सुनील शिंदे, माणिक पडवळ, अनिल कांकरिया आदी उपस्थित होते.
तळवडे, सोनवणे वस्ती, कुदळवाडी, चिखली, शांतीनगर, प्राधिकरण सेक्टर ७ व १० तसेच एमआयडीसी भोसरी या औद्योगिक परिसरात चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. चोरटे गटागटाने येऊन सुरक्षा रक्षकाला हत्याराचा धाक दाखवून चोरी करतात, सुरक्षा रक्षक निशस्त्र असल्यामुळे प्रतिकार करू शकत नाही. कंपन्यांनी सी.सी.टी.व्ही.फुटेज देऊन देखील चोरांचा किवा चोरी झालेल्या मालाचा पोलिसांना तपास लागलेला नाही.
या मांडल्या समस्या…
१. पोलीस दप्तरी औद्योगिक परिसरात चोऱ्या करणाऱ्या ज्या अट्टल गुन्हेगारांची नोंद आहे, त्यांच्यावर कायमस्वरूपी कडक प्रतिबंधात्मक कारवाई केली गेली पाहिजे. महिला वर्गांचे दागिणे हिसकावले जातात. चोरी केली जाते. पुरुष कामगारांना अडवून त्यांच्याकडील रोकड, मोबाईल काढून घेतले जातात, त्यांना मारहाण केली जाते. त्यामुळे कामगारांच्या कामावर येण्याच्या व घरी जाण्याच्या वेळेत पोलीस गस्त घालण्याची व्यवस्था केली पाहिजे.
२. लघुउद्योग हे माथाडी कामगार कायद्याच्या कक्षेत येत नाहीत. तरीही स्वयंघोषित अनधिकृत माथाडी कामगार संघटना त्यांचे कामगार कामावर ठेवाव प्रोटेक्शन मनी द्या, असे धमकावत त्रास देत असतात. कंपनीमध्ये चोरी व इतर त्रास होईल या भीतीने उद्योजक तक्रार करण्यास पुढे येत नाही.
३. चोरीला गेलेले भंगार हे त्या परिसरातील अनाधिकृत भंगार खरेदी करणाऱ्या दुकानातच विकले जाते. या अनाधिकृत भंगार खरेदी करणाऱ्या दुकानाचा शोध घेउन त्यांच्यावर कायमस्वरूपी कारवाई करावी.
४. तळवडे व चिखली औद्योगिक परिसरात सकाळी व संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी सकाळी कंपन्या चालू होण्याच्या वेळेस व संध्याकाळी कंपन्या सुटण्याच्या वेळेस होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी योग्य ते पोलीस बळ उपलब्ध करून देऊन या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे.