- पंतप्रधान मोदींनी मराठीत भाषण करीत उपस्थित वारकऱ्यांची मनं जिंकली…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२२) :- ”जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, तोचि साधू ओळखावा देव तेथेची मानावा”.. तुकाराम महाराजांचे अभंग नवीन पिढीसाठी प्रेरणा आहेत. समाजाच्या पिढीबरोबर येतो त्याला अभंग म्हणतात. तुकारामांचे अभंग उर्जा देतात. देहू ही भगवान पांडुरंगाची भूमी आहे. संत तुकारामांची जन्म भूमी आणि कर्म भूमी आहे. धन्य देहुगाव; पुण्यभूमी भाव. देहूचे शिळा मंदिर भक्तीचे केंद्र होईल, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी (दि. १४) देहूत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, हभप. मारुती महाराज कुरेकर, संस्थांचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, आचार्य तुषार महाराज भोसले आणि वारकरी भक्त समुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत गोरोबा, संत नामदेव, संत चोख मेळा, संत जगनाडे महाराज आदी संत परंपरा समाजातील जाती व्यवस्था, भेदभाव समूळ नष्ट करण्याची आणि राष्ट्रभक्ती आणि समाज भक्तीचीच प्रेरणा देतात. समाजातील शेवटच्या स्तरातील व्यक्तीचा विकास हेच संतांचे उद्दिष्ट आहे. तेच उद्दिष्ट या सरकार समोर आहे. गरीब, पिछडा, आदिवासी आणि इतरांचे कल्याण होवो यासाठी सरकार कटिबद्ध आहे. समाजाला गती देण्यात छत्रपती शिवाजी महाराज, तुकाराम महाराज या राष्ट्र्नेत्यांची भूमिका महत्वाची आहे. संत तुकारामांची वाणी उर्जा देते. काही दिवसांनी पंढरपूरची यात्रा सुरु होणार आहे. मथुरा, काशी, चारधाम, अमरधाम या यात्रा सामाजिक आणि अध्यात्मिक गतिशीलता साधतात. ”एक भारत श्रेष्ठ भारत”चा नारा देतात. भारत हजारो वर्षांपासून विविधतेशी जोडला आहे. राष्ट्रीय एकतेसाठी प्राचीन अध्यात्म चैतन्य देतं. हे सरकार गेल्या आठ वर्षांपासून आधुनिक जगात विकास आणि विरासद याची सांगड घालून काम करीत आहे. देहू-आळंदी पालखी मार्ग, चारधाममध्ये प्रशस्त रस्ते, अयोध्येत रामाचे मंदिर,काशीचे नवे स्वरुप तर सोमनाथमध्ये विकासकामे जोरात सुरु आहेत. तीर्थस्थाने आणि पर्यटन रस्त्यांचा विकासही होतोय आहे. आंबेडकरांच्या पंचतीर्थांचा विकासही झालायं. चैत्यभूमी, दीक्षाभूमी नव्या पिढीना परिचित होणार आहेत. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास असंभव गोष्टी संभव होतात. सरकारच्या योजना शंभर टक्के लोकापर्यंत पोहोचवित आहोत. स्वच्छ भारत, प्लास्टिक मुक्तीचा संकल्प केलाय; त्यासाठी सर्वांची भागीदारी हवी. शेतीसाठी मोहीम सुरु आहे. मिळून काम करू. काही दिवसांनी योग दिवस येणार आहे. ही संताची देन आहे. मोठ्या उत्सवात साजरा करू. तूर्तास ”जय जय रामकृष्ण हरी; हर हर महादेव”.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्या सर्वांसाठी आज आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा आहे. मी मागच्या जन्मात मोठे पुण्य केले. त्यामुळेच मला येथे उपस्थित राहता आले. तुकाराम महाराजांनी समाजाला दिशा दिली. समाज कर्मकांड, बुवाबाजी यात अडकला असताना भागवत धर्माची पताका घेऊन साधू संतानी प्रबोधन करीत समाजाला अध्यात्माची वाट दाखविली. यात तुकाराम महाराज अग्रेसर होते.