न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जून २०२२) :- पंजाबी गायक, काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधव याच्या टोळीतील सात जणांना व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून देशी बनावटीची तेरा पिस्तुले जप्त करण्यात आली आहेत. जाधवच्या टोळीतील दोन साथीदारांनी मध्यप्रदेशातील मनवर येथून पिस्तुले आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी जाधवचे साथीदार जीवनसिंग दर्शनसिंग नहार (वय २३, रा. मंचर), श्रीराम रमेश थोरात (वय ३२, रा. मंचर), जयेश रतीलाल बहिराम (वय २४, रा. घोडेगाव), वैभव उर्फ भोला शांताराम तिटकारे (वय १९, रा. जळकेवाडी, चिखली), रोहित विठ्ठल तिटकारे (वय २४, रा. सरेवाडी, नायफड), सचिन बबन तिटकारे (वय २२, रा. धाबेवाडी, नायफड), जिशान इलाइबक्श मुंढे (वय २०, रा. घोडेगाव) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात नारायणगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे.
खंडणी प्रकरणी नारायणगावमधील एका व्यावसायिकाने फिर्याद दिली होती, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. जाधव याने पाच ते सहा महिन्यांपूर्वी या व्यावसायिकाला समाजमाध्यमातील दूरध्वनी सेवेचा वापर करुन पन्नास हजार रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली होती. घाबरलेल्या व्यावसायिकाने तक्रार दिली नव्हती. त्यानंतर जाधवने पुन्हा व्यावसायिकाकडे खंडणी मागितली होती. जाधवने साथीदाराला व्यावसायिकाकडे पाठविले होते. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मुसेवाला हत्या प्रकरणात जाधवला अटक करण्यात आल्याचे समजल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.
पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर जाधवच्या साथीदारांना अटक करण्यात आली. न्यायालायाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आरोपी जयेश बहिराम आणि एकाला मध्यप्रदेशातील मनवर येथून पिस्तुले आणण्यासाठी जाधवने पाठविले होते. आरोपींकडून पिस्तुलांसह, आठ मोबाइल संच, मोटार जप्त करण्यात आली आहे.
मुसेवाला यांच्या हत्येनंतर जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरोपी जयेश बहिराम आणि साथीदारांनी मध्यप्रदेशातून पिस्तुले आणली. जाधवचा लॉरेन्स बिष्णोई टोळीशी थेट संबंध आहेत. खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या जाधव टोळीतील सात जणांची चौकशी करण्यात येत आहे. त्याने पिस्तुले कशासाठी आणली, त्यांचा बिष्णोई टोळीशी संबंध आहे का ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, संतोष जाधव आणि साथीदारांनी आणखी काही व्यावसायिकांकडे खंडणी मागितल्याचा संशय आहे. जाधव टोळी विरोधात न घाबरता तक्रार करावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॅा. अभिनव देशमुख यांनी केले आहे.
















