न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२२) :- आगामी काळात दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्री असे सण येणार आहेत. या सणाच्या काळात व्यापारी आणि नागरिकांकडून सार्वजनिक मंडळे वर्गणी गोळा करतात. मात्र, वर्गणी गोळा करताना मंडळांनी जबरदस्ती केल्यास खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला आहे.
यंदाच्या वर्षी १९ ऑगस्ट रोजी गोपाळकाला, ३१ ऑगस्ट रोजी गणेशोत्सव आणि २६ सप्टेंबर रोजी नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे. गेली दोन वर्ष शासनाने निर्बंध घातल्याने हे सर्व सण अगदी साधेपणाने साजरे करण्यात आले. मात्र यंदाच्या वर्षी कोणतेही निर्बंध असणार नाहीत. यामुळे दोन वर्षांनी साजरे होणारे सण अगदी जोरात साजरे करण्याचे नियोजन सार्वजनिक मंडळांनी ठरविले आहे.
शहरातील विविध भागात दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मंडळांच्या बैठका सुरू आहेत. मंडळांप्रमाणे नोकरदार, दुकानदार आणि उद्योजक यांनाही करोनाचा फटका बसला आहे. ही बाब ध्यानात घेऊन मंडळांनी वर्गणीची जबरदस्ती करू नये, अशी अपेक्षा आहे. मात्र दुसरीकडे मंडळांनीही कोणाकडून किती वर्गणी घ्यायची आहे हे ठरविले आहे. यामुळे आगामी काळात मंडळांसोबत वाद होण्याची शक्यता आहे.
याबाबत बोलताना पोलीस आयुक्त अंकुश शिंदे म्हणाले की, मंडळांनी नागरिकांकडून स्वईच्छेने वर्गणी घ्यावी. कोणावरही वर्गणीसाठी जबरदस्ती करू नये. जर नागरिकांकडून वर्गणीबाबत जबरदस्ती केल्याची तक्रार आल्यास संबंधित मंडळाच्या कार्यकर्त्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल.