- तरुणाच्या कुटुंबाला ५० लाखांची नुकसान भरपाई द्या – अमित गोरखे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ ऑगस्ट २०२२) :- विजेच्या खांबाला हात लागल्यामुळे शॉक लागून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वीजवितरण कंपनीच्या गलथान काभारामुळे ही घटना घडली आहे. हकनाक तरुणाला जीवाला मुकावे लागले आहे. ही घटना काळभोरनगरमध्ये आज शुक्रवारी (दि. ५) रोजी सकाळी ७ वाजता घडली. नितीन काशिनाथ मेलाळे (वय ३४ वर्षे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
तरुणाच्या मागे दोन लहान मुले, पत्नी, आई, वडील व एक लहान भाऊ असे कुटुंब आहे. मयत तरूण हा एका खासगी कंपनीमध्ये काम करत होता. वीजवितरण कंपनीने दुर्घटनेची जबाबदारी स्वीकारून तरुणाच्या कुटुंबाला त्वरित ५० लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी. तरुणाच्या कुटुंबातील एकाला वीजवितरण कंपनीमध्ये कायमची नोकरी द्यावी, अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.