- सध्या निवडणुकांचा ट्रेंड बदलाय; वार्डात सूक्ष्म नियोजन करा – अजितदादा पवार..
- राजकारणात पद देऊन घात केल्यास काय वेदना होतात ते दादांना ठाऊक – भाऊसाहेब भोईर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२२) :- ” आता तोच प्रभाग राहील की बदलेल याबाबत काहीही निश्चित सांगता येणार नाही. कोर्टाने सांगितलयं निवडणुक लावा. मात्र त्या दोघांनी रद्द केलेल्या प्रभागरचनेच्या बाजूने काहीजण कोर्टात गेले आहेत. कोर्टाला पटवून देण्यात अपीलकर्ते यशस्वी झाले तर निवडणुका कधीही लागू शकतात. त्यासाठी तुमची तयारी आताच करून ठेवा. गाफील राहू नका. सध्या निवडणुकांचा ट्रेंड बदलला आहे. ९२, ९७ ,२०००, २०१२, आणि २०१७ च्या निवडणुकांसारख्या पुढील निवडणुका नसणार आहेत. निवडणुकांचा ट्रेंड बदलतोय. शहरातील नागरिकांच्या राहणीमानात बदल झाला आहे. त्यांच्या गरजा बदलल्या आहेत. त्यामुळे वार्डात सूक्ष्म पद्धतीने नियोजन करा ”. ”आपली राष्ट्रवादी आपली पालिका” ही मशाल पेटवून कामाला लागा, असा कानमंत्र राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शहरातील कार्यकर्त्यांना दिला.
‘निर्धार महाविजयाचा, संवाद कार्यकर्त्यांचा’ या अनुषंगाने शनिवारी (दि. ६) राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ‘कार्यकर्ता संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात करण्यात आले होते, त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, आझमभाई पानसरे, संजोग वाघेरे, जगदीश शेट्टी, रविकांत वर्पे, वसंत बोराटे, विशाल वाकडकर, प्रशांत शितोळे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, गैरसमज दूर होण्यासाठी संवाद आवश्यक आहे. सत्तांतर घडत असते. आपलं आपण काम करीत रहायचं. जनतेच्या प्रश्नांमध्ये लक्ष घाला. नव्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षाची ध्येय धोरणे समजून घ्यावीत. अडीच वर्षे कोरोना संकट काळात महाविकास आघाडीने चांगले काम केलं आहे. जनतेला याची आठवण करून द्या. सध्या कोरोना कमी झाला असला तरी स्वाइन फ्ल्यू चे संकट वाढले आहे. स्वतःसह नागीकांमध्ये जनजागृती करा. जनता कोणालाही उलथून टाकू शकते. जनतेच्या मनातील आतल्या आवाजाला ओ देण्याच काम आपण सर्वांनी केल पाहिजे. देशाच्या परिवर्तनाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा हा विचार आहे. हे काम लोकांपर्यंत न्या. ओबीसी आरक्षण हे महाविकास आघाडीचे यश आहे, कुणा एकाचे नाही. बूथमध्ये कमिट्या झाल्या पाहिजेत. सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या वार्डाचा अभ्यास करा. काही वार्डात परिपूर्ण रिसोर्स टीम तयार करा. त्यात डॉक्टरांपासून, वकील ते प्लंबरपर्यंतच्या व्यवसायीकांचा समावेश करा. प्रत्येक वार्डातील बलस्थानांचा अभ्यास करा. कमकुवत भागात वेगळे नियोजन करा. त्यामुळे चांगले यश मिळण्यासाठी मदत होणार आहे. युती की आघाडीचा निर्णय राज्य स्तरावर होईल. जिल्ह्याच्या ठिकाणी स्थानिकांना जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात येईल. राष्ट्रवादीला शहरात सर्वोत्तम होण्यासाठी पयत्न करा. १५ ऑगस्टला राष्ट्रध्वज घरोघरी लावा. सर्व महापुरुषांचे देशासाठी हे योगदान आहे त्याचा हा आनंदाचा क्षण आहे. निगडीतील भक्ती शक्ती येथे डौलाने राष्ट्रध्वज फडकला पाहिजे. त्यासाठी आयुक्तांना भेटा. घरघर राष्ट्रवादी पोहोचवा. ”आपली राष्ट्रवादी आपली पालिका” ही मशाल पेटवून कामाला लागावे. पालिकेत पक्षाला सत्तेवर नेण्यासाठी एकजुटीने काम करा. विजय आपलाच आहे. कष्ट करा संघर्ष केल्याशिवाय काही मिळत नाही.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, पूर्वी बीजेपीचे तीन नगरसेवक निवडून यायचे. भाजपने असे काय काम केलं होतं तेव्हा त्यांना भरभरून मत मिळाली?. आपल्याला स्वतःचे आणि शहराच्या इतिहासाचे आत्मचिंतन करावे लागेल. निर्धार करताना पाठीमागची पार्श्वभूमी तपासून पहावी. तिकीट मिळाल तर येईल, तिकीटच नाही मिळाल तर येणार नाही. आगामी निवडणुकीत उभा रहायच्या अगोदरच पडायची तयारी असे करू नका. अशाने सत्ता गेल्यावर शरमेने मन खाली घालून जायची वेळ येते. प्रतिष्ठेसाठी पत निर्माण करावी लागते. अजितदादांनी बारामतीवर जेवढे लक्ष दिले नाही तेवढे लक्ष पिंपरी चिंचवडवर दिले. काहीजण आमदार, पदाधिकारी झाले त्यातील बरेच त्यांना सोडून गेले. राजकारणात पद देऊन घात केल्यास काय वेदना होतात ते दादांना माहित आहेत. अजितदादांमुळे आपली ओळख आहे. त्यांनी कार्यकर्त्यांची फळी उभी केली. आजही कुठला कार्यकर्ता कुठे बसतो? काय करतो याची सर्व गुपितं दादांना माहिती असतात. शहराची आता वाताहत झाली आहे. आता शहरात २५ गट आहेत. अजितदादा आणि रामकृष्ण मोरे यांनी शहराचं नंदनवन केलं. गेल्या पाच वर्षात बीजेपीने केलं तरी काय? पक्षाला विकासाने झपाटलेली माणसे पाहिजेत. दादांना २५ वर्षे ओळखतो. आज दादा गेल्यानंतर अजित गव्हाणे यांनी बोलवले तर कार्यकर्त्यांनी हजर राहिले पाहिजे. सर्वजन मिळून संकल्प करू भ्रष्ट सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोंबाबोंब करू.
अजित गव्हाणे म्हणाले, राज्यत काही दिवसांपासून अस्थिरता निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांबाबत संभ्रम आहे. अजित दादांच्या नेतृत्वाखाली ओबीसीना न्याय मिळाला. भाजपने आपल्यामुळे हा निर्णय झाल्याची दवंडी पिटवली. त्यावेळी भाजप मात्र गुवाहाटी आणि गोव्याला फिरत होती. मात्र श्रेय घ्यायची जुनी सवय मोडत नाही. यंदाच्या निवडणुका चार, तीन, दोन की एक प्रभाग पद्धतीने होणार हा प्रश्न सोडा. पक्ष संघटनेत युवक, महिला आदींची ताकद वाढली आहे. काहीही झाले तरी महापालिकेत महापौर राष्ट्र्वादीचाच होणार आहे. त्यांना काय करायचे ते करू द्या. दोन मंत्र्यांचा चुकीचा कारभार जनता उघड्या डोळ्याने पाहतेय. आपली सत्ता येणारच आहे. ९१ साली शहराने दादांना खासदार केल. दादा चुकीचे काम कधीच करीत नाहीत. सत्ता बदलताच आता आयुक्तांकडून दबावाखाली महापालिकेत पुन्हा चुकीचे काम होत आहे. पाच वर्षात भाजपने मोठा भ्रष्टाचार केलाय. शहराला अधोगतीकडे नेले.
रविकांत वर्पे म्हणाले, महाराष्ट्रात अतिवृष्टीचे सावट असताना दादांनी महाराष्ट्राचा दौरा केला. सत्तेत नसतानाही महाराष्ट्र अजितदादांच्या भरोशावर आहे. भाजपने महाराष्ट्रात अधिकारशाही आणली. कोरोना काळात दादांनी तळ ठोकून मंत्रालायात राहून मोठे कार्य केले. शिवभोजन थाळी देत लोकांची उपासमार थांबविली. कोरोना काळात कौन्सिल हॉलला रेकोर्डब्रेक बैठका केल्या. त्यावेळी कुठे होते महेश लांडगे आणि चंद्रकात पाटील. दादांनी निधी दिला नाही अशी त्या ४० आमदारांची ओरड चुकीची आहे. कोरोना काळात केंद्राने खासदारांचा निधी कमी केला मात्र, अजितदादांनी आमदारांना पाच कोटीचा निधी वाढवून दिला. ईडी चुकीचं काम करीत आहे. मोदींच्या हर घर तिरंगा लावण्यासाठी घराची गरज आहे. घरावरदेखील जीएसटी लावून घर महाग केलं आहे.