पिंपरी चिंचवड शहरात देखील लोकांमधूनच महापौर होऊ द्या – अजित पवार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरात पाच वर्षात्त भाजपने कशी कामे केली हे आता लोकांना माहित झालय. शहराचा विकास करीत असताना कारभाऱ्यांना वेळोवेळी योग्य सल्ला आणि सत्तेवर अंकुश दबदबा वाटला पाहिजे. यांना तर कुणीच विचारणार नव्हत. स्मार्ट सिटीने शहरात पुढील वीस वर्षांचे नियोजन करून रस्त्यांचे काम करायला पाहिजे होते. पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, चिंचवडमधील रस्ते स्मार्ट सिटीच्या नावाखाली अरुंद केले आहेत. येथील सत्ताधाऱ्यांनी करदात्यांच्या पैशांवर डल्ला मारला, असा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी शहर भाजपवर केला.
चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात शनिवारी (दि. ६) रोजी ‘कार्यकर्ता संवाद’ सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
अजितदादा पुढे म्हणाले, राष्ट्र्वादीने पिंपरी चिंचवडमध्ये कामे केली हे बाहेरची देखील मान्य करतात. आता शहरातील लोक मान्य करू लागलेत. सत्तेत असताना सारथी पोर्टल सुरु केले. तेही यांनी बंद पाडले. यांना जनतेमधूनच कारभारी करायचा असेल तर पिंपरी चिंचवड शहरात देखील लोकांमधूनच महापौर होऊ द्या. लोकांना संधी मिळू द्या ते कुठल बटन दाबतील यांना कळणारही नाही.
चांगल चालणारं महाविकास आघाडी सरकार अस्थिर करीत पाडण्यात आलं. सध्या देवेंद्र फडणवीस बिनखात्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्याला त्याचा काही उपयोग नाही. मावळातील सात वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तीचा खून केला. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. अशा आरोपीला आठ दिवसाच्या आत फाशी दिली पाहिजे. याकड सरकारमधल कोणी लक्ष द्यायला नाही. मुख्यमंत्री अधिकाऱ्यांकडे मंत्री मंडळाचे अधिकार देऊन निघून जातात. मंत्री मंडळ अस्तित्वात न आणता डॉ बाबसाहेब आंबेडकरांच्या घटनेचा अवमान केला जातोय. महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका निवडणुकांच्या मुदती संपल्या. निवडणुका घेऊन दिल्या जात नाही. लोकशाहीचा खून पाडला जातोय.
अधिकारच द्यायचेच आहेत तर नगरपालिका, पंचायत समितीबरोबरच राज्याचेदेखील अधिकार चीफ सेक्रेटरीला देऊन दोघांनीही घरी बसावं. लवकर लवकर म्हणता तुमचं मंत्रिमंडळ येणार तरी कधी. तुमची अडचण काय? कोर्ट की दिल्ली. महागाई, पेट्रोल आणि डीझेलचा दर एक आणून ठेवलाय. पेट्रोल आणि सीएन जीचे दर आज एकसारखेच झालेत. जीएसटीमुळे जनता होरपळून निघतेय. कर जरूर लावावा पण ज्याची द्यायची अडचण आहे त्याच्याकडून कसला कर घेता. कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र आमचा, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरणारे माझ्यावर निधी वाटपात अन्याय झाल्याची बोंब करतात. हे म्हणजे नाचता येईना अंगण वाकडे अशातली गत आहे. कार्यकर्त्याला न्याय देणं सोडून हे निलंबित अधिकारी पुन्हा कामावर घेऊ लागलेत. ही टिकोजीरावांची नीती खराब आहे. हम दो म्हणत असले तरी ते मिस्टर इंडिया होऊ शकत नाहीत. विरोधकांचा आवाज दाबण्याची पद्धत घातक आहे.