- सर्वोच्च न्यायालयाकडून पालिकेच्या याचिकेची दखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचा पंतप्रधान आवास योजनेतील रावेत येथील प्रकल्प भूसंपादनाच्या वादात अडकला आहे. हा प्रकल्प लवकर मार्गी लागण्यासाठी महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पाबाबत महापालिकेला दिलासा दिला असून, महिनाभरात सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले आहेत.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरात चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी आणि रावेत येथे तीन प्रकल्प सुरू आहेत. या तीनही प्रकल्पांतील लाभार्थी निश्चित झाले आहेत. यापैकी चऱ्होली, बोऱ्हाडेवाडी प्रकल्पाचे काम सुरू आहे. मात्र, मागील तीन वर्षांपासून रावेतमधील प्रकल्पाचे काम बंद आहे. जागेसंबंधित व्यक्तीकडून उच्च न्यायालयात आक्षेप घेत भूसंपादनाबाबत दावा दाखल केला होता.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने याप्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाकडून लवकरात लवकर न्यायनिवाडा व्हावा, अशी मागणी महापालिकेने सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेत केली होती. हा प्रकल्प पूर्ण होऊन लाभार्थ्यांना घरे मिळावीत यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. त्याला यश आले असून, उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे, असे महापालिकेचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांनी सांगितले.