न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२२) :- महापालिका प्रशासनाने अवैध नळजोड नियमित करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. मात्र, या मोहिमेला नागरिकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. नळजोड नियमितीकरणासाठी तीन महिन्यांची मुदत देऊनही शहरात फक्त १ हजार ५७३ जणांचे नळजोड नियमित करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे अर्ज आले आहेत. यामध्ये ह प्रभागातून सर्वाधिक ५८८, ब मधून २९९ तर सर्वात कमी अ प्रभागात ७८ अर्ज आले आहेत.
शहरात ५ लाख ७९ हजार मिळकतींची नोद आहे. मात्र, त्या तुलनेत अधिकृत नळजोड धारकांची संख्या कमी आहे. शहरात अवैध नळजोड धारकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. चुकीच्या पद्धतीने नळजोड केल्याने पाण्याची गळती होते. तसेच दूषित पाणीपुरवठाही होतो. याचा परिणाम विस्कळीत पाणीपुरवठ्यावर होतो. त्यासाठी महापालिकेने वेळोवेळी अवैध नळजोडाचे सर्वेक्षण केले आहे. अवैध नळजोड नियमितीकरणासाठी सवलती जाहीर केल्या. मात्र, नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही.
महापालिकेने अवैध नळजोड नियमित करण्यासाठी जून, जुलै आणि ऑगस्ट अशा तीन महिन्यांची विशेष मोहीम राबविली. घरगुती ग्राहकांकडून केवळ अनामत आणि दंडापोटी ५ हजार रुपये आकारण्यात येणार होते. या ग्राहकांना थकीत पाणीपट्टीसह प्रतिमहिना आकारण्यात येणारे अतिरिक्त शुल्कही माफ करण्याचे धोरण आखण्यात आले होते. तरीही अल्प प्रतिसाद मिळाला आहे. यामध्ये निवासी भागातून ७७० तर झोपडपट्टी भागातून ८०३ असे १ हजार ५७३ जणांचे अर्ज आले आहेत. यामधील ११२९ अर्ज निकाली काढले असून, ४४४ अर्ज प्रलंबित आहेत.