न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ सप्टेंबर २०२२) :- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर सुनावणी सुरु आहे. सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्दय़ांवर पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुरु असलेल्या सुनावणीकडे संपर्ण देशाचं लक्ष आहे. खरी शिवसेना कोणाची, याबाबत निवडणूक आयोगापुढे सुनावणी प्रलंबित असून, ती सुरू करायची की नाही, याबाबतचा निर्णय आज अपेक्षित आहे.
न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शहा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी सुरु आहे.
जेवणाच्या विश्रांतीनंतर शिंदे गटाच्या वतीने युक्तिवाद करणारे ज्येष्ठ वकील मनिंदर सिंग यांनी उद्धव ठाकरेंनी बहुमत चाचणीपूर्वी राजीनामा दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. सभागृहातील बहुमत गमावल्याचा हा मोठा पुरावा असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. तर विधानसभा अध्यक्ष राजकीय पक्षाकडे जाणार नाहीत”
विधानसक्षा अध्यक्ष नेहमी नेत्याशी संवाद साधतात, जे सभागृहाचे सदस्य असतात. व्हीपमध्ये बदल झाल्यास अध्यक्ष नेत्याला विचारणा करतील, ते राजकीय पक्षाकडे जाणार नाहीत असा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला.
जुन्या निकालांचा हवाला देताना नीरज कौल यांनी युक्तिवाद केला आहे की, घटनेनुसार एखादा छोटा गटही आम्ही पक्षाचं प्रतिनिधित्व करतो असा दावा करु शकतो. दोघांमधील कोणता पक्ष प्रतिनिधित्व करतो याचा निर्णय घेताना अनेक गोष्टी गृहीत धरल्या जातात आणि प्रत्येक गटाचं संख्यात्मक बळ हा एक महत्त्वाचा आणि संबंधित घटक असतो. दरम्यान यावेळी त्यांनी पक्षचिन्हाचा वाद परिच्छेद १५ नुसार सोडवला जाऊ शकतो असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं.
पक्षाच्या फुटीबाबत निर्णयाचा अधिकार विधानसक्षा अध्यक्षांना नाही असा युक्तिवाद नीरज कौल यांनी केला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा १० व्या सूचीचा उल्लेख केला आहे.