न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेचे तारांगण, जलशुद्धीकरण केंद्र या प्रकल्पांचे उद्घाटन अनेक महिन्यांपासून रखडले आहे. या प्रकल्पांचे उद्घाटन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र, राज्यामध्ये सत्ताबदल झाल्यानंतर उद्घाटन रेंगाळले. या प्रकल्पांच्या उद्घाटनाला मुहूर्त मिळाला असून, येत्या सोमवारी (दि. २८) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या वतीने सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी आंद्रा, भामा आसखेड धरणाचे पाणी आणण्यासाठी प्रकल्पाचे काम सुरू आहे. यापैकी आंद्रा धरणाचे १०० एमएलडी पाणी शहराला पुरविण्याची तयारी महापालिकेने पूर्ण केली आहे. त्यासाठी चिखली जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीसयांच्या हस्ते लोकार्पण न झालेला बहुचर्चित तारागंण प्रकल्प, निगडी प्राधिकरणातील गदिमा नाट्यगृह, चौकातील विविध शिल्प, मोशी अग्निशमन केंद्र, इंद्रायणीनगर उद्यान व विरंगुळा केंद्र याचे उद्घाटन होणार आहे. तसेच अमृत प्रकल्पातील एसटीपी, जिजाऊ क्लिनिकचे भूमिपूजनाचे नियोजन आहे.
सत्ताबदलापासून हे प्रकल्प उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. प्रकल्प तयार असतानाही केवळ राजकीय पुढाऱ्यांना वेळ नसल्याने या प्रकल्पांचे उद्घाटन लांबले होते. मात्र, अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचे नियोजन सुरु झाले. गुरुवारी (दि. २४) पालिकेमध्ये याबाबत विभागप्रमुखांची बैठक घेण्यात आली.