न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ डिसेंबर २०२२) :- नवी सांगवी परिसरातील अनेक समस्या जैसे थे अवस्थेत असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत अजित पवार यांनी महापालिका आयुक्तांना रखडलेल्या कमांकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्यानुसार सर्व कामांची कार्यवाही करण्यात आल्याचे पत्र स्मार्ट सिटी प्रशासनाने नुकतेच राजेंद्र जगताप यांना दिले. निवेदनाची प्रशासनाने दखल घेतल्याबद्दल जगताप यांनी समाधान व्यक्त केले.
अजित पवार पिंपरी चिंचवड दौऱ्यावर आले होते. यावेळी राजेंद्र जगताप यांनी अजित पवार यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत अजित पवार यांनी पिंपळे गुरवमधील या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना केल्या होत्या. त्यानुसार सर्व कामांची प्रशासनाने दखल घेतल्याचे पत्र नुकतेच पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे उपअभियंता चंद्रकांत मोरे यांच्या स्वाक्षरीचे पत्र राजेंद्र जगताप यांना मिळाले आहे.
राजेंद्र जगताप यांना मिळालेल्या पत्रात म्हटले आहे, की मुख्य रस्त्यातील रस्त्याच्या चौकातील तुटलेले किंवा निघालेले ब्लॉक बदलण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये भगतसिंग चौक, सृष्टी चौक, सेव्ह ट्री चौक, त्रिमूर्ती चौक येथील ब्लॉक बदलण्यात येणार आहेत. सद्यस्थितीत स्मार्ट सिटी विभागामार्फत जलनि:स्सारण नलिका, पावसाळी पाण्याच्या नलिका टाकण्यात आलेल्या आहेत, त्या ठिकाणी कुठेही पाणी साचून राहत नाही. ज्या ठिकाणी रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते त्या ठिकाणचे चेंबर व झाकणांचे होल साफ करण्यात आले आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या रस्त्यालगतच्या नागरिकांच्या घरात पाणी जाण्याची समस्या पूर्णपणे बंद केलेली आहे, असा खुलासा या पत्रात करण्यात आला आहे. याबद्दल राजेंद्र जगताप यांनी समाधान व्यक्त केले.