न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२३) :- माझी परिस्थिती थोडी खुशी थोडी गम अशी आहे. आम्ही मविआ म्हणून या निवडणुकीला सामोरे गेलो. भाजपाकडे असलेली कसब्याची जागा महाविकास आघाडीने खेचून आणली आहे. चिंचवडलाही हे घडलं असतं पण तिथे काही लोकांना तिकिटं हवी होती. राहुल कलाटेलाही मी थांबायला सांगितलं होतं. त्याचा फॉर्म निघू नये म्हणूनही प्रयत्न झाले, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी पुण्यात दिली.
राज्यकर्त्यांनी कसबा असेल किंवा चिंचवड असेल दोन्हीकडे सगळे प्रयत्न पणाला लावले. पण पुण्यात त्यांना यश आलं नाही. दोन्ही जागा भाजपाच्या होत्या. चिंचवडमध्ये सहानुभूतीचा मुद्दा होता. तसंच शिवसेनेचं जे चिन्ह आणि पक्ष काढून घेतलं त्यामुळे मतदार चांगलेच चिडले होते. शिवसैनिक आणि शिवसेनेला मानणाऱ्या मतदारांमध्ये ही चिड आम्हाला पाहण्यास मिळाली असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
चिंचवडची मतमोजणी सुरू आहे. तिथेही आम्ही टफ फाईट देण्याचा प्रयत्न आम्ही केला. एक मेसेज गेला आहे राज्यात की तीन पक्ष एकत्र आले आणि नुसतं जागांचं वाटप नाही पण जनतेच्या मनातले उमेदवार ओळखून दिले तर पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळेल हेच या दोन पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला लक्षात येतं आहे. जेव्हा जनता एखादी गोष्ट ठरवते तेव्हा सहानुभूतीचाही विचार जनता करत नाही. कसबा पेठेत हे आपण पाहिलं असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. जनतेने एकदा मनात निश्चय केला की बाकी कुणाचा पाठिंबा किंवा काय आहे त्याला अर्थ राहात नाही. आत्ता जे सरकार सत्तेत आलं आहे ते जनतेला आवडलेलं नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.