- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मार्च २०२३) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) कडे सन २०२१ मध्ये ८६१ संशोधक विद्यार्थ्यांनी फेलोशिपसाठी अर्ज केलेले आहेत. या विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सर्व संशोधक विद्यार्थ्यांना महाज्योती आणि सारथीच्या धर्तीवर सरसकट फेलोशिप मंजूर करावी, अशी मागणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
या संदर्भात अमित गोरखे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आधिछात्रवृत्ती २०२१ च्या पात्र विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी. मागील वर्षी २०१९-२०२० मध्ये बार्टी कडून ५१७ विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे महाज्योती आणि सारथी या दोन्ही संस्थांनी अर्जदार सर्व संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप दिलेली आहे. याच धर्तीवर बार्टीकडे अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देणे अपेक्षित आहे.
सध्या हा प्रस्ताव सामाजिक न्याय विभाग विभागाकडे प्रलंबित आहे. सन २०२१ मध्ये ८६१ संशोधक विद्यार्थ्यांनी बार्टीकडे फेलोशिपसाठी अर्ज केलेले आहेत. या अर्जांची प्रक्रिया पूर्ण करून पुढील मान्यतेसाठी बार्टीने सामाजिक न्याय विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे २६ डिसेंबर २०२२ रोजी प्रस्ताव पाठवला आहे. त्यावर तात्काळ निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे नुकसान टाळावे आणि २०२१ च्या सर्व संशोधक विद्यार्थ्यांना महाज्योती आणि सारथीच्या धरतीवर सरसकट फेलोशिप देण्यात यावी, असे अमित गोरखे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रातून अनेक विद्यार्थी व विद्यार्थी संघटना याबाबत माध्याकडे विनंती करीत आहेत. त्यांची निवेदने माझ्याकडे प्राप्त झालेली आहेत. या विद्यार्थ्यांचे हीत विचारात घेऊन सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मंजूर करावी. ही विनंती राज्य शासनाला केली आहे. राज्य शासन सकारात्मक निर्णय घेऊन या सर्व विद्यार्थ्यांना दिलासा देईल.
– अमित गोरखे, माजी अध्यक्ष, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ…