न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२३) :- मालाड, अप्पापाडा, मुंबई येथे १३ मार्चला लागलेल्या आगीत जवळपास साडेचार हजार कुटुंबाची लोकवस्ती अक्षरशः जळून खाक झाली. सर्व संसार उध्वस्त झाले आहेत. मालाड अप्पापाडा येथील अनेक विद्यार्थ्यांच्या एप्रिलमध्ये परीक्षा आहेत आणि त्यांना शैक्षणिक साहित्याची गरज आहे व हे साहित्य होलसेलमध्ये कुठे मिळेल अशी पोस्ट मुंबईच्या सामाजिक कार्यकर्त्या जयाताई बनसोडे यांनी सोशल मीडियावर केली होती.
त्यांची पोस्ट पाहून रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी त्यांच्याशी संपर्क करून आपण साहित्य विकत घेऊ नका आम्ही आपणाला रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्य देतो असे कळवले. जयाताई बनसोडे यांनी पिंपरी येथील संस्थेच्या संपर्क कार्यालयाला भेट दिली व त्यांच्याकडे मालाड येथील विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक वही एक पेन अभियाना अंतर्गत जमा केलेल्या साहित्यातून रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने ६० डझन वह्या, पेन व विद्यार्थ्यांसाठी बूट त्यांच्याकडे सुपूर्त केले. शैक्षणिक साहित्याची मदत केल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्या जयाताई बनसोडे यांनी संस्थेचे आभार मानले.
यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, प्रदेश महासचिव संतोष शिंदे, मावळ तालुका अध्यक्ष अतुल वाघमारे, मावळ तालुका महासचिव विक्रांत शेळके उपस्थित होते.