- ‘मी निवडणूक लढविण्यावर ठाम’; आढळरावांचे कोल्हेंसमोर आव्हान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ मे २०२३) :- भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येईल असे वाटत नाही. एकत्र आले तर आमच्या शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. भाजप-शिंदे गट-राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले तर, आनंद होईल, असे मत शिंदे गटाचे उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी गुरुवारी व्यक्त केले. राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे भाजपमध्ये आल्यास मला अडचण नाही. पण, मी निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचेही ते म्हणाले.
शिरुर लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात आढळराव यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याशी चर्चा केली. शिंदे गटाचे उपनेते इरफान सय्यद आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर आढळराव यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आढळराव म्हणाले,की शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा कशामुळे दिला याबाबत काहीच सांगता येत नाही. अखंड राष्ट्रवादी नव्हे तर अजित पवार भाजपसोबत येतील अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजप-राष्ट्रवादी एकत्र येईल असे वाटत नाही. एकत्र आल्यास आमच्या शिवसेनेवर कोणताही परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खंबीर आहेत. भाजप-शिवसेना (शिंदे गट) – राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले तर त्याचा आम्हाला आनंदच होईल. भविष्यात काय होईल माहिती नाही. संधी मिळाली तर लढेनच.
मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. पुन्हा दुसऱ्या पक्षात जाण्याचा प्रश्न येत नाही. ज्या लोकसभा मतदारसंघात तत्कालीन शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराचा पराभव झाला, त्या मतदारसंघावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. शिरूमध्ये युतीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे या मतदारसंघात केंद्रीय मंत्री येत आहेत. डॉ. अमोल कोल्हे भाजपमध्ये येतात की नाही माहीत नाही. त्यांची भाजपशी जवळीक वाढली असेल. पण, शिरुरची जागा शिवसेनेची आहे. भाजप नेते पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हे यांची समजूत काढावी. मी निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. कोल्हे भाजपमध्ये आले तर चांगली गोष्ट आहे. शिवसेना-भाजप युती वाढावी हीच आमची भूमिका आहे. मला काही अडचण नाही. कोल्हे भाजपमध्ये आल्यानंतर कोणत्या मतदारसंघातून लढतात यावर त्यांचा प्रचार करायचा की नाही हे ठरविणार आहे, असेही आढळराव यांनी सांगितले.















