न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ सप्टेंबर २०२३) :- शहराच्या विस्ताराच्या तुलनेत महापालिकेची अग्निसुरक्षा यंत्रणा तोकडी आहे. गेल्या दीड वर्षातील आगीच्या १,०३८ घटनांत कोट्यवधींचे नुकसान झाले. महापालिकेकडून मात्र ही यंत्रणा सक्षम करण्याकडे डोळेझाक होत आहे. अग्निशमन विभाग केवळ नाहरकत प्रमाणपत्र (एनओसी) देण्यासाठी आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.
पिंपरी चिंचवडची लोकसंख्या सुमारे ३० लाखांच्या घरात आहे. झोपडपट्ट्यांसह दाट लोकवस्तीचा भाग मोठ्या प्रमाणावर आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. उपनगरांमध्ये औद्योगिक तसेच आयटी कंपन्या सुरू झाल्या आहेत. चिखली परिसरात भंगाराची, जुन्या फर्निचर, साहित्याची गोदामे आहेत. या परिसरात आगीच्या घटना सातत्याने घडतात. विशेषतः मार्च आणि एप्रिलमध्ये आगीचे प्रमाण अधिक असते. यावर्षी या दोन महिन्यांत दोनशेहून अधिक आगीच्या घटना घडल्या, लोकसंख्येनुसार शहरात १८ अग्निशमन केंद्रे असणे गरजेचे आहे. मात्र, नऊ केंद्रांवर काम भागवले जाते.
पन्नास हजार लोकसंख्येसाठी एक अग्निशमन वाहन अपेक्षित असते. सद्य:स्थितीत नऊ केंद्रांमध्ये महापालिकेचे ९३ व प्रशिक्षणार्थी ११० कर्मचारी कार्यरत आहेत. केवळ २७ वाहने आहेत. कर्मचाऱ्यांना तीन शिफ्टमध्ये काम करावे लागते. रजा मिळत नाही. बऱ्याचदा जागेची पाहणी न करताच नव्या कंपनीला, बांधकामाला एनओसी दिली जाते
पुनावळे, च-होली, एमआयडीसी भोसरी, दिघी येथे अग्निशमन उपकेंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरु आहे. आवश्यकतेनुसार अद्ययावत वाहने आणि यंत्रसामग्री खरेदी करण्यात येणार आहे. आवश्यक संख्येने कर्मचारी भरती प्रक्रियाही सुरु करण्यात आली आहे. आगामी काळात पिंपरीत मध्यवर्ती अग्निशमन केंद्र उभारण्याचेही नियोजन आहे.
– प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त…