- मोठा अपघात घडल्यानंतर येणार का प्रशासनाला जाग?..
- चाकरमान्यांच्या जीवाशी लावलाय खेळ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२३) :- चाकण-तळेगाव मार्गावरील महाळुंगे येथील दगडी पुलाच्या बांधकामाला सुमारे ८० ते ९० वर्षे झाली आहेत. सध्या दुरवस्थेमुळे हा पूल धोकादायक बनला आहे. पुलाच्या बांधकामात झाडेझुडुपे वाढलेली आहेत. तसेच दोन्ही बाजूंना मोठे खड़े पडले आहेत. सतत अवजड वाहने मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असल्याने पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
धोकादायक पुलांचे सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्वेक्षण करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट केव्हा झाले, हे कुणी अधिकारी ठामपणे सांगत नाही. पुलाच्या क्षमतेपेक्षा या पुलावरून एका वेळेस शेकडो वजनांचे अवजड कंटेनर ये-जा करीत आहेत. त्यामुळे या पुलाला कधीही धोका उद्भवू शकतो, अशी भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
चाकण, तळेगाव मावळ येथे औद्योगिक वसाहत झाल्यानंतर या पुलावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. औद्योगिक वसाहत असल्याने अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. चाकण-तळेगाव मार्गाचे काही वर्षांपूर्वी बीओटी तत्वावर नूतनीकरण करण्यात आले होते. त्यावेळी या पुलाच्या बांधकामाला धक्का न लावता तात्पुरती डागडुजीचे काम करण्यात आले होते. सध्या या पुलाचे काही ठिकाणी बांधकाम पडले आहे. तसेच काही ठिकाणी तडे गेले आहेत.