न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23 ऑक्टोबर 2023) :- घरकुलच्या माध्यमातून नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होत असून लाभार्थींच्या जीवनात यामुळे मोठा बदल होणार आहे. या घरांमध्ये येणारी पिढी तयार होणार असून त्यांना चांगले आयुष्य लाभेल असं काम करा. तसेच या सदनिकांचा योग्य पद्धतीने वापर करा, आपल्या सदनिकेची स्वच्छता ठेवावी व मिळालेली सदनिका भाड्याने देऊ नये अथवा विक्री करू नये, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले तसेच लाभार्थींचे पुढील आयुष्य सुख समृद्धीचे, भरभराटीचे जावो अशा शुभेच्छाही दिल्या.
केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने लिंकरोड पत्राशेड येथील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत असून या प्रकल्पातील इ इमारतीतील एकूण १११ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृह येथे काढण्यात आली.
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी उज्ज्वला गोडसे, कार्यकारी अभियंता अनघा पाठक, कार्यालय अधिक्षक विष्णू भाट यांच्यासह झोनिपू विभागातील कर्मचारी आणि लाभार्थी उपस्थित होते.
यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थेसाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी अध्यक्षांचा अतिरिक्त आयुक्त जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी लाभार्थींनी आता हक्काचे व स्वतःचे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे, घराचा वापर स्वतः करावा, इमारती भोवती झाडे लावून योग्य प्रकारे निगा राखावी व जतन करावे आणि विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर गृहप्रवेश करावा. तसेच महापालिका नागरिकांना सुसज्ज सुविधा देण्यासाठी नेहमीच कार्यरत असते असेही अतिरिक्त आयुक्त जगताप म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीस सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी प्रकल्पाची माहिती दिली तसेच अनेक वर्षांच्या तपस्येचे फळ लाभार्थींना मिळत असून लाभार्थींनी सदनिकांचा वापर योग्य रितीने करावा असे आवाहन केले. तसेच झोपडीपासून इमारतीपर्यंतचा प्रवास तुम्ही केला आहे त्यामुळे हा जीवनातला खुप मोठा बदल आहे. तुमची येणारी पिढी या घरात राहणार आहे त्यामुळे तुमच्यातही बदल होणे गरजेचे आहे असेही बोदडे यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार विष्णू भाट यांनी मानले. यावेळी लाभार्थ्यांनीही आपल्या मनातील भावना उपस्थितांसमोर बोलून दाखवल्या.