न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ नोव्हेंबर २०२३) :- मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी आज (दि. १) रोजी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली होती. यामध्ये राज्यातील ३२ आमदार आणि विविध पक्षातील नेते उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासंदर्भात ठराव झाला आहे. मात्र, यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेण्यावर एकमत झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
यावरून मनोज जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केला असून अजून किती वेळ द्यायचा असा सवाल पत्रकार परिषदेतून उपस्थित केला आहे. ते म्हणाले, “सरकारने आता वेळ मागितला आहे. मी उपोणषाला बसून ७-८ दिवस झाले. पण, आता सांगत आहेत की वेळ हवाय. कशासाठी आणि किती वेळ हवाय हे सरकारने सांगावं. मग मी समाजाशी बोलून वेळ द्यायचा की नाही ते ठरवेन”, असं मनोज जरांगे म्हणाले. तसंच, “आजच्या बैठकीतील तपशील पाहण्याची माझी इच्छा नाही. गोर गरिबांच्या पोरांना अन्याय सहन करावा लागत असातना हे नेते हसण्यावारी नेत आहेत. यांना जनता सांभाळणारं सरकार म्हणायचं का?” असा सवालही जरांगेंनी विचारला.
“आम्ही चर्चेला चार दिवसांपासून बोलवत आहोत, पण ते येत नाहीत. पण यांना काड्या घालायची सवय लागली आहे. त्यामुळे मराठ्यांमध्ये दम निघत नाही. मराठे तापट आहेत. तुम्हाला आरक्षणासाठी वेळ हवा असेल तर मला बोलता येतंय तोवर चर्चेसाठी या. तुम्हाला किती वेळ हवाय ते सांगा. देवेंद्र फडणवीसांनी चर्चेसाठी यावं, रस्त्यांवर तुम्हाला कोणीही अडवणार नाही. माझे मराठा तुम्हाला संरक्षण देतील. पण आज संध्याकाळपासून मी पाणीही सोडणार आहे, मग बघू मराठ्यांना कसं आरक्षण देत नाहीत”, असा इशाराही मनोज जरांगे पाटलांनी दिला.
सरकारला कशासाठी आणि किती वेळ हवाय हे त्यांनी सांगावं, मराठ्यांना कसं आरक्षण देणार आहेत हे सांगावं, वेळ घेतल्यानंतर सरसकट आरक्षण देणार आहात का? हे सांगा, त्यानंतर आम्ही वेळ द्यायचा की नाही ते ठरवू. नाहीतर पाच मिनिटांचाही वेळ देणार नाही. मग काय व्हायचंय ते पाहू, असंही ते म्हणाले.
आमच्या रक्तामासांत लढण्याची शक्ती आहे. त्यामुळे सरकारने बाजारचाळे करू नका, नेट सुरू करा. मराठे शांततेत आंदोलन करणार. ही लढाई आरपारची आहे. नेट बंद केल्याने आंदोलन थांबणार नाही. आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही. सर्वपक्षीय बैठकीत सर्व नेते होते. कोणताच पक्ष आपला नाही हे आता मराठ्यांना समजलं. सरकारला वेळ द्यायचा की नाही हे समाजाशी बोलून ठरवलं जाईल. आज रात्रीपासून पाणी बंद. उद्रेकाला आमचं समर्थन नाही, आमचं आंदोलन शांततेत सुरू राहणार आहे. असे महत्वाचे मुद्दे मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत.