- अनधिकृत गतिरोधकांच्या संख्येमुळे वाहनचालकांचं मोडलयं कंबरड..
- तीर्थक्षेत्र अनं औद्योगिक क्षेत्र असूनही प्रशासन केवळ बघ्याच्या भूमिकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. १८ नोव्हेंबर २०२३) :- देहूतील अंतर्गत बाह्यवळण मार्ग आणि देहूरोड येथील मुख्य रस्त्यावरील गतिरोधकामुळे वाहनचालक बेजार झाले आहेत. येथील गतिरोधकांची संख्या कमी करण्यासह नियमाप्रमाणे उभारण्याची मागणी होत आहे.
देहूतील नागरीकरण वाढत असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढत आहे. तुकाराम बीज, पालखी सोहळा, कार्तिकी यात्रा या वेळी लाखो भाविक देहूत दाखल होतात. दरम्यान, देहूगावात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी बाह्यवळण मार्ग तयार करण्यात आला. श्रीमंत भैरवनाथ चौक, सांगुर्डी फाटा, परंडवाल चौक, विठ्ठलवाडी असा मार्ग आहे. अवजड वाहनांसह इतरही वाहने या मार्गावरून जातात. या मार्गावर ठिकठिकाणी गतिरोधक उभारले आहेत, त्यातील अनेक गतिरोधक अमानांकित असून, त्यावर पांढरे पट्टेही नसल्याने रात्रीच्या वेळी ते नजरेस पडत नाहीत.
तसेच देहू ते देहूरोड या मार्गावर तब्बल २५ पेक्षा अधिक गतिरोधक आहेत. या मार्गावरून वाहन चालविताना चालक पुरते हैराण होतात. या मार्गावरून श्री क्षेत्र देहूसह चाकण एमआयडीसी, तळवडे आयटी पार्क, जुना मुंबई-पुणे महामार्ग, द्रुतगती मार्ग, पिंपरी-चिंचवड, पुणे आदी ठिकाणी वाहन जात असतात.
त्यामुळे, या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. यामध्ये दुचाकी, चार चाकी यासह मोठ्या वाहनांचाही समावेश असतो. मात्र, अगोदरच खड्डे त्यात पुन्हा भरमसाठ गतिरोधक अशी या रस्त्याची स्थिती आहे. दोनशे, तीनशे मीटर अंतरावर हे गतिरोधक उभारले आहेत. यावर आदळून वाहनाचे नुकसान होते. तसेच चालकांनाही आरोग्याबाबतच्या समस्या उद्भवतात. या गतिरोधकांमुळे चालकांना वाहनांचा वेग कमी ठेवावा लागतो. यामुळे, वाहनांच्या रांगा लागतात. त्यामुळे, येथील गतिरोधकांची संख्या कमी करून प्रमाणित गतिरोधक उभारण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.