न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ फेब्रुवारी २०२४) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उद्यापासून १ ते २६ मार्च या कालावधीत परीक्षा होणार आहे. परीक्षेसाठी १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा सुरक्षित वातावरणात होण्यासाठीच्या उपाययोजना राज्य मंडळाने केल्या असून, २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. निवडणूक आचारसंहिता लागली, तरी परीक्षेवर फारसा परिणाम होणार नाही.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर या वेळी उपस्थित होते. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळ स्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उत्तरपत्रिकेची गोपनीयता राहण्यासाठी सहायक परीरक्षक बैठे पथक म्हणून परीक्षा केंद्रावर कार्यरत राहतील. तसेच प्रश्नपत्रिकांची गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून वितरित करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येईल. सहायक परीरक्षक यांनी त्यांच्या मोबाइलचे जीपीएस सुरू ठेवणे आवश्यक आहे. राज्य मंडळाच्या भरारी पथकासह जिल्हा स्तरावरही भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. परीक्षेच्या वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या इयत्ता 10 वीच्या लेखी परीक्षांना उद्या शुक्रवार दि. 1 मार्च 2024 पासून सुरूवात होत आहे. परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी शासन विविध उपाययोजना करीत असून विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षा द्याव्यात, असे आवाहन करून शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.