न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२४) :- आम आदमी पार्टीच्या वतीने पालकांच्या शालेय शिक्षण संदर्भातील समस्या समजून घेण्यासाठी पालकांशी संवाद आकुर्डी येथील कार्यालयात घेण्यात आला. पालकांच्या वतीने पालकांसाठी कार्यक्रमाचे आयोजन आम आदमी पार्टीचे पदवीधर आघाडीचे प्रदेशाध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी केले.
भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्या स्मृतीला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाला आप महाराष्ट्रचे सहसचिव सागर पाटील, माजी शिक्षण अधिकारी आर. जे. जाधव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश परदेशी, ज्ञानेश्वर ननावरे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रममध्ये पालकांनी फी दरवाढ, शिक्षकांच्या बदल्या, वाहतूकीच्या नावाखाली होणारी लूट, गणवेश आणि इतर साहित्य खरीदी साठी शाळेकडून होणारी सक्ती, पी.टी.ए समिती, आर. टी. ई(शिक्षण हक्क कायदा) आणि अनेक विषयासंदर्भात मुद्दे मांडले.
माजी शिक्षण अधिकारी आर. जे. जाधव यांनी शिक्षण व्यवस्थेवर मार्गदर्शन करत असताना पालकांच्या समस्या गंभीर आहेत आणि सरकारने त्याच्यावर त्वरित समाधान काढले पाहिजे, असे मत व्यक्त केले. प्रकाश परदेशी यांनी समाजामधल्या समस्या समजून घेण्यासाठी असे संवादाचे कार्यक्रम घेण्याची गरज सध्या अधिक गरज आहे असे मत व्यक्त केले. पालकांच्या समस्या आणि सरकारची भूमिका यावर प्रश्न चिन्ह ज्ञानेश्वर ननावरे यांनी उपस्थित केले.
महाराष्ट्रतील खाजगी शाळांना लाजवेल अश्या दिल्ली आणि पंजाबमधील सरकारी शाळा अरविंद केजरीवाल यांनी तयार केल्या आहेत. राज्यातसुद्धा हे बदल घडवण्यासाठी आपची गरज आहे असे, आप महाराष्ट्रचे सहसचिव सागर पाटील यांनी म्हटले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी मुख्याध्यापिका अरुणा सिलम यांनी तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयदीप सूर्यवंशी, मारुती वाघमारे, पूनम गीते, भावसार, कोरे, राजेंद्र शिंदे, सुनिल बोडरे, मोहसीन गडकरी यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन चेतन बेंद्रे यांनी केले.