न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहूगाव वार्ताहर (दि. २४ एप्रिल २०२४) :- जगद्गुरू संत तुकाराम महाराज ३३९ वा पालखी सोहळा येत्या २८ जूनला देहूमधून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुखपदी माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, संतोष महाराज मोरे या विश्वस्तांची निवड करण्यात आली.
संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांचे अध्यक्षतेखाली देहू येथे देऊळवाड्यात बुधवारी (दि .२४) बैठक झाली. त्यात सर्वानुमते वरील निवड करण्यात आली. यावेळी विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे हे उपस्थित होते.
माणिक महाराज मोरे म्हणाले, ‘‘यंदा पालखी सोहळ्याचे २८ जूनला प्रस्थान आहे. या सोहळ्या निमित्त संत तुकाराम महाराज संस्थान जय्यत तयारी करणार आहे. देहू ते पंढरपूर या पालखी मार्गावर वारीतील वारकऱ्यांना विविध सोयी-सुविधा देण्यासाठी एक महिना अगोदर पालखी मार्गावर पाहणी करणार आहे.
यंदाचा पालखी सोहळा कडक उन्हाळा व निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर होत असला तरी भाविकांना व वारकऱ्यांना याचा फारसा फरक पडत नाही. त्यामुळे यंदा पालखी सोहळा नेहमी प्रमाणेच उत्साहात होण्याची शक्यता असून यंदा पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाचे हे या विश्वस्त मंडळाचे शेवटचे वर्ष असल्याने यंदाचा पालखी सोहळा प्रमुख म्हणून विशाल केशव मोरे, माणिक महाराज मोरे व संतोष महाराज मोरे यांच्याकडे जबाबदारी सोपविलेली आहे.
उरुळी कांचन येथील ग्रामस्थांना विनंती करून दुपारचा विसावा पालखी मार्गावर म्हणजे महामार्गावर ठेवावा अशी विनंती करणार आहे. त्याच प्रमाणे लोणी काळभोर येथील मुक्कामही नवीन पालखी तळावर करणार असल्याची माहिती श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी दिली.