- सोन्याचा धूर काढणाऱ्या चाकणसह शिरुर लोकसभा मतदारसंघाची वाटचाल बकालपणाकडे?
- नेत्यांची विकासाकडे पाहण्याची संकुचित वृत्ती हानीकारक; मतदारांनो जागे व्हा…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२४) :- शिरुर लोकसभा मतदारसंघाची २०१९ ची निवडणूक चाकण येथील वाहतूककोंडीवर गाजली होती. इतकच नव्हे तर औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ, रस्त्यांबाबत आश्वासनेही देण्यात आली होती. मात्र, पाच वर्षांनंतरही या समस्या तसूभरही कमी झालेल्या नाही. वाहतूककोंडी जैसे थेच राहिली आहे. विमानतळ पुरंदरला हलवले गेले. पुणे-नाशिक याशिवाय पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, इंद्रायणी मेडीसिटी हे प्रकल्प नाव घेण्यापुरतेच राहिले आहे. प्रश्न जुनेच आहेत; पण वेळ नवी असली तरी त्यावर कोणताही लोकप्रतिनिधी भाष्य करत नसल्याने आम्ही असेच संघर्षमय जीवन जगायचे का? असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
चाकण, तळेगाव, शिक्रापूर आणि रांजणगाव या भागात औद्योगिक वसाहत आहे. त्यामुळे नेहमीच पुणे- नाशिक आणि तळेगाव-शिक्रापूर या प्रमुख महामार्गावरील सर्वच चौकांमध्ये वाहतूक कोंडी होत असते. पुणे-नाशिक मार्गावरील चिंबळीफाटा, मोई फाटा, कुरुळी फाटा, स्पाईसर चौक, आळंदी फाटा, चाकण शहरातील तळेगाव चौक, आंबेठाण चौक, तळेगाव-शिक्रापूर रस्त्यावरील खालुंब्रे, एच. पी. चौक, महाळुंगे, खराबवाडी, चाकण चौक, माणिक चौक यापुढेही साबळेवाडी दरम्यान कुठे ना कुठे वाहतूककोंडी होतच असते. पुणे-नाशिक मार्गावरील चिंबळी फाटा ते राजगुरू नगरपर्यंत पोहोचण्यासाठी दोन ते तीन तास लागत आहेत, तर खालुंब्रे ते साबळेवाडीदरम्यानचे अंतर कापण्यासाठी तीन ते चार तास लागतो आजही तशीच परिस्थिती आहे. समस्येतून सुटण्यासाठी किती दिवस वाट पहायची असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान २०१३ मध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खेड-सिन्नर महामार्ग मंजूर केला. मात्र, तो तांत्रिकदृष्ट्या अडचणीत आला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला गेला आणि २०१९ मध्ये राजगुरुनगर, खेड घाट, मंचर, नारायणगाव, आळेफाटा आणि कळंब येथे बाह्यमार्ग तयार करण्यात आले. त्यामुळे वाहतूकोंडी थोडीशी कमी झाली. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळाची घोषणा करण्यात आली. पण इच्छाशक्तीअभावी हे विमानतळ पुरंदरला हलवण्यात आले. त्यानंतर कोणीही विमानतळासाठी प्रयत्न केले नाही. एकीकडे वाहतूककोंडी, ना विमानतळ ना सुरक्षा यामुळे कंपन्या इतरत्र जाऊ लागल्या. त्यामुळे रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोना काळात शिरुर मतदारसंघात मध्यवर्ती ठिकाणी मोठे रुग्णालयाची आवश्यकता भासली. त्यातूनच इंद्रायणी मेडीसिटी प्रकल्पाचा जन्म झाला. परंतु, हा प्रकल्प नक्की काय आहे. तो कुठे होणार याबाबत अजूनपर्यंत लोकांना स्पष्ट माहिती नाही आहे. दुसरीकडे वाहतूककोंडी सोडवण्यासाठी नाशिक आणि नगर महामार्गावर पुन्हा एक उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्याची कल्पना आली. इतकच नाही तर तांत्रिकदृष्ट्या शक्य नसतानाही शिवनेरीवर रोप-वेचाही गाजावाजा झाला. पण हे प्रकल्प कितपत शक्य आहे स्पष्टता येणे आवश्यक असतानाही तसे न झाल्याने केवळ हे दिवास्वप्नच असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे. समस्या सुटण्यासाठी आणखी किती दिवस वाट पहावी लागणार. चाकण, तळेगाव, शिक्रापूर आणि रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील मालाची पुणे, मुंबई, नाशिक, मराठवाडा आदी ठिकाणी ये-जा करणाऱ्या वाहनांना उचितस्थळी पोहोचण्यासाठी मर्यादपेक्षा जास्त अवधी लागत आहे. कंपन्यांना माल वेळेत मिळत नाही, यामुळे इंधन आणि आर्थिक नुकसान होत आहे, याला शिरूर लोकसभा मतदार संघाचे आजपर्यंत झालेले लोकप्रतिनिधी आणि त्यांची विकासाबाबत संकुचित वृत्ती जबाबदार आहे. त्यामुळे मतदारांनी या बाबींचा अभ्यास करूनच आपल्या उमेदवाराला मत द्याव.