- आढळरावांना मताधिक्क्य मिळवून देण्यात कमी पडल्याचा होतोय आरोप..
- ऐनवेळी मतांच्या घसरणीमुळे पराभव लादला जातोय?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२४) :- शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त आहे. येथे भाजपचे आमदार आहेत. तसेच राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर माजी आमदार व शहराध्यक्षही महायुतीत सहभागी झाले. त्यामुळे भोसरीतून महायुतीच्या उमेदवाराला बळ मिळणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी भोसरीतून ९ हजारांचे मताधिक्य घेतले आहे. विशेष म्हणजे मागीलवेळी शिवाजीराव आढळराव-पाटील यांना येथून ३६ हजार ७७ मताधिक्य मिळाले होते. ते भरून काढून कोल्हेंनी नऊ हजार मते अधिक मिळवली आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघातील भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये ५ लाख ५१ हजार ५८२ मतदार आहेत. शिरूरमध्ये गतवेळी जातीच्या आधारावर निवडणूक लढली गेली. त्यावेळी भोसरीतून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉ. कोल्हेंवर आघाडी घेतली होती. मात्र, आताची निवडणूक पक्षनिष्ठा आणि शरद पवार यांना असलेली सहानुभूती यावर लढली गेली.
दुसरीकडे भोसरी परिसरातील पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या माजी नगरसेवकांनी अंतिम टप्प्यात प्रचारात हात आखडता घेतला, असा आरोप होतोय. विद्यमान आमदार महेश लांडगे भाजपचे आहेत. येथे माजी नगरसेवकांची संख्याही जास्त आहे. शिवाय राष्ट्रवादीचे (अजित पवार) शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी आमदार विलास लांडे हेही याच मतदारसंघात येतात. तर, दुसरीकडे घड्याळाचा प्रचार केला तर आगामी महापालिका निवडणुकांमध्ये कोणत्या तोंडाने मते मागायची? असा प्रश्न माजी नगरसेवकांसमोर असल्याची चर्चा होती. त्यामुळे महायुतीचे उमेदवार आढळराव-पाटील यांना फटका बसल्याचे बोलले जात आहे. तथापि इतर पाच विधानसभा मतदारसंघांच्या तुलनेत कोल्हे यांना येथून मिळालेले ९ हजारांचे मताधिक्य कमीच आहे.
दरम्यान आढळरावांचा पराभव शहर भाजपच्या जिव्हारी लागला आहे. शहर भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी भोसरीतून आढळरावांना कमी झालेल्या मताधिक्क्याला भोसरीचे आ. महेश लांडगे यांना जबाबदार धरले आहे. शिरूर लोकसभा निवडणुकीत आमदार महेश लांडगे यांनी मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात भाजपच्या बैठकीत एक लाख मतांनी आढळराव पाटील यांनी लिड देऊ, अशी घोषणा केली होती. परंतु, शब्द फिरवीत ऐनवेळी आमदार महेश लांडगे यांनी डॉ. अमोल कोल्हे यांना छुपा पाठिंबा दिला. त्यामुळेच आढळराव पाटलांना शिरूर लोकसभा निवडणुकीत हार मानावी लागली, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच हे दोघेही जुने मित्र असून राजकारणात फक्त दाखवण्यासाठी वेगळे चित्र निर्माण केले जात असल्याचेही ते म्हणाले आहेत.
त्यामुळे विधानसभा आणि पालिका निवडणुकीआधीच पक्षात आताच वादाला सुरुवात झाली असल्याचे दिसते. लोकसभेतील अनपेक्षित अपयशानंतर गट-तट आताच डोके वर काढू लागले आहेत. त्यामुळे भाजपच्या पिंपरी चिंचवड या बालेकिल्ल्यात पक्षश्रेष्ठींनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.