- शरद पवार यांची वाकडच्या सभेत नाराजी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०२४) :- ‘ लोकसभेनंतर महाराष्ट्र कोण चालवणार हा निकाल आता आपल्याला द्यायचा आहे. एके काळी महाराष्ट्र एक नंबरचे राज्य होते. ठराविक लोकांच्या हातात सत्ता आली आणि चित्र बदललं. आण्णासाहेब मगर, डॉ. श्री. श्री. घारे आदि नेत्यांनी आपल्या भागाला चेहरा दिला. पण; आज ते चित्र राहील नाही. या शहर व परिसरात उद्योगधंदे वाढवले. हिंजवडीत आयटी पार्क आणले. हजारो लोकांना काम दिले. पण; आज जमेच्या बाजू नाही, नुकसानीच्या बाजू दिसतात. शहराचा चेहरा दिवसें दिवस खराब होतोय, मूलभूत सुविधांची पूर्तता होत नाहीये, असे चित्र आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. यावेळी उमेदवार राहुल कलाटे, माजी खासदार विदुरा उर्फ नाना नवले, कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे, पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, शिवसेना (उबाठा)चे संजोग वाघेरे, माजी नगरसेवक तुकाराम भोंडवे, गणेश भोंडवे, मच्छिंद्र तापकीर, संपत पवार, देवेंद्र तायडे, महिला आघाडी शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, अनिता तुतारे, वैशाली मराठे, सागर तापकीर आदि उपस्थित होते.
पिंपरी, चिंचवड विधानसभेचा ६० टक्के भाग माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात होता. अलीकडे माझा संपर्क कमी झाला आहे. मूलभूत गरजा पाणी, लाईट, स्वच्छता, पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) याबाबत गेल्या दहा वर्षात हवे तसे काम झाले नाही. आयटी कंपन्यासाठी हिंजवडी आणि चिंचवडचे नाव होते. मात्र आज ३०-३५ सुप्रसिध्द कंपन्या इथून निघून गेल्या. हजारो लोकांचे हाताचे काम गेले. गेले दहा वर्ष सत्ता असलेल्या लोकांनी सत्तेचा विनीयोग तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी केला नाही. त्यासाठी सत्तेमध्ये बदल करण्याची गरज आहे. राष्टवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, आप आदि सर्वानी ठरवले सत्ता परिवर्तन करायचे. त्यासाठी राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली आहे, असे पवार म्हणाले.
राहुलना एकदा संधी द्या; पुन्हा सोन्याचे दिवस दाखवितो
राहुलना महानगरपालिकेचा अनुभव आहे. नागरी प्रश्नांचा त्यांचा अभ्यास उत्तम आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्याचा त्याचा निर्धार आहे. त्यामुळे लोकांच्या समस्या सोडविण्याची दृष्टी असलेल्या राहुल कलाटेंच्या हातात सत्ता दिली पाहिजे. त्यांना आपण विधानसभेची संधी द्यायला पाहिजे. पक्षाचे चिन्ह ‘तुतारी वाजवणारा माणूस’ असून राहुलला एकदा संधी द्या या उद्योनगरीला पुन्हा सोन्याचे दिवस दाखविल्याशिवाय मी राहणार नाही, असे आवाहन शरद पवार यांनी केले.
















