- राज्यपाल अभिभाषनाद्वारे राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच केलं अभिनंदन…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०९ मार्च २०२५) :- महाराष्ट्र विधानपरिषद सदस्य अमित गोरखे यांनी राज्यपाल अभिभाषणावर अभिनंदन व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्र राज्य गुंतवणुकीच्या बाबतीत आघाडीवर असून सेवा, वित्त, बँकिंग तसेच माहिती तंत्रज्ञान, ऑटोमोबाईल यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे. विशेषतः एफडीआय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे.
राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे झाली असून पाच हजारहून अधिक तरुणांना अनुदानित रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान, स्टार्टअप्स आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. पर्यटन क्षेत्रात महाराष्ट्र मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक आकर्षित करत असून, राज्यातील ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांमध्ये गुंतवणुकीस चालना देण्याचा सरकारचा मानस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर राबविण्यात येत असलेल्या ‘घरघर संविधान’ उपक्रमास जनमानसाचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. हा उपक्रम संविधान जागरूकता वाढवून लोकशाही अधिक बळकट करण्यास मदत करत आहे.
संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे, याबद्दल अमित गोरखे यांनी संपूर्ण शिवप्रेमी जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि लहुजी साळवे यांच्या स्मारकांचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्य सायबर सुरक्षा आणि डेटा संरक्षणाच्या बाबतीत आघाडीवर आहे. डिजिटल युगातील वाढत्या धोक्यांना सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा यंत्रणेमध्ये सुधारणा केली जात असून, डेटा सुरक्षिततेसाठी नवीन धोरणे राबविण्यात येत आहेत. राज्य शासनाच्या धोरणांमुळे महाराष्ट्र शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून नव्या शैक्षणिक सुधारणा, संशोधन आणि विकास योजनांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना अधिक संधी उपलब्ध होत आहेत.
राज्यपाल अभिभाषणाने महाराष्ट्राच्या प्रगतीचा आलेख स्पष्ट केला असून सरकारच्या विविध योजनांमुळे राज्य सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडीवर राहील, असा विश्वास विधानपरिषद सदस्य अमित गोरखे यांनी व्यक्त केला.













