न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. ५ मार्च) :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भोसरीमधील गावजत्रा मैदानावर आज मंगळवार (दि. ५) रोजी जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मेळाव्यास संबोधित करताना आमदार अजित पवार म्हणाले की, ”महाराष्ट्रात आगामी लोकसभेच्या ४८ जागांवर काय होणार? याबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून चित्र-विचित्र तर्कवितर्क मांडले जात आहेत. या निवडणुकीसाठी एकमेकांची उणीदुणी काढणारे सेना- भाजप एकत्र लढणार आहेत. सेनेने २५ वर्ष भाजपबरोबर काम केले. परंतु, सत्तेत असूनही एकमेकांना शिव्या देणारे, वाईट बोलणारे, राजीनामे खिशात ठेवणारे आज एक झाले आहेत.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीबरोबर सेक्युलर भूमिका असणारे पक्ष एकत्र आणण्याचे काम सध्या सुरु आहे. यात आरपीआय, शेतकरी कामगार पक्ष व आदी पक्षांना एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचा शिरूर मतदारसंघाचा उमेदवार कोण? याचे उत्तर शरद पवारच देतील. आम्ही आमच्या सत्ताकाळात शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम केले. कष्टकऱ्यांची नगरी असलेल्या या शहरातील नागरिकांना हक्काचे घर मिळावे. उद्योगधंदे अडचणीत येत कामा नये, यासाठी आम्ही काम केले.
आज देश, राज्य व महापालिका स्तरावर भाजपची काय अवस्था आहे. आज देशात पिंपरी चिंचवड शहराचे नाव काढले, तर बेरोजगार म्हणून लोक चेष्टा करतात. ४५ वर्षात जे घडले नाही ते भाजपच्या सत्ताकाळात घडले आहे. हे पाप कोणाचे? मोदी सरकार रोजगार किती मिळाला याची आकडेवारी जाहीर करीत नाही. केवळ जाहिरातबाजी केली जात आहे. भूमिपूजन व उद्घाटणासाठी देशाचा पैसा वाया घालवला जात आहे. पिंपरी, चिंचवड, चाकण, हिंजवडी, तळवडे, खेडमध्ये किती कंपन्या आल्या? आहेत त्या कंपन्या बंद होत आहेत. उद्योगनगरी अशी ओळख असलेल्या शहराला गुन्हेगारीने विळखा घातला आहे. कोणाचाच धाक नाही व लक्ष नाही. नुसते रोजगार मेळावे घेऊन रोजगार मिळत नसतात.
आज उद्योगपती थांबा.. नंतर पाहू… वातावरण चांगले नाही… अशी भूमिका घेऊन नवीन व्यवसाय सुरु करीत नाहीत. केवळ सत्तेतून पैसा अन. पैशातून सत्ता या सत्तेच्या गुर्मीत सध्याचे सरकार आहे. शहरात स्मार्ट सिटी म्हणून कोणता प्रकल्प राबविला? पवना, इंद्रायणी या नद्या जलपर्णीने व्यापून गेल्या आहेत. त्यातही सत्ताधारी भ्रष्टाचार करीत आहेत. पवना धरणातून पाणी आणण्याचा निर्णय आम्ही घेतला त्याचे पुढे काय झाले? सेना भाजपचे आमदार काय करतात? बेस्ट सिटीचे केवळ कचरा सिटी बनविले आहे.
निगडी ते कात्रज मेट्रोचे काय? नागपूरमध्ये मेट्रो चालू झाली. आम्ही सत्तेत असताना करोडो रुपये आणून विकास केला. मेट्रो कधी होणार? आणखी विलंब तर आणखी किंमत वाढणार. एच. ए. कामगाराने पगार न मिळाल्यामुळे हत्या केली. गेल्या ४ वर्षात कर्मचाऱ्यांची वाताहत करून ठेवली आहे. आम्ही शहराला बेस्ट सिटीचा पुरस्कार मिळवून दिला. पाणीपुरवठा, गुन्हेगारी, कामगार, बकालपणा, आदी समस्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. केवळ गाजर दाखविण्यात हे सरकार स्मार्ट आहे”, अश्या शेलक्या शब्दात अजित पवार यांनी सेना-भाजपवर आरूढ ओढला आहे.